Showing posts with label नवे तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label नवे तंत्रज्ञान. Show all posts

Sunday, August 8, 2010

'दाश'बोध

परवा मुंबई विद्यापीठात प्रा. डॉ. बिजॉयकुमार दाश यांचं भाषण आणि प्रेझेन्टेशन झालं. 'टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन इन हायर एज्युकेशन' असा विषय होता. येत्या तीन-चार वर्षांत कॉम्प्युटर्स, प्रोजेक्टर्स अशा साधनांचे जे नवे सोपे, स्वस्त आणि छोटे अवतार येणार आहेत त्यांची त्यांनी ओळख करून दिली. थ्रीडी इमेजेस् सहजगत्या दाखवू शकणारी ही सारी साधने घरोघरी, गावोगावी उत्तमोत्तम शिक्षक पोहोचवू शकतील अशा क्षमतेची आहेत. त्यांनी काही अल्ट्रा कपॅसिटर्स दाखवले. दहा तास उर्जा पुरवठा- म्हणजे वीज पुरवठा करू शकणारे हे कपॅसिटर्स चार्ज करायला फक्त एक मिनिट लागते. वाटाण्याएवढे एलइडी लाइट्स प्रत्येकी चारशे वॅट्स् इतक्या ताकदीने उजेड देऊ शकतील. आपल्या गावोगावचे शिक्षण होण्यातल्या फिझिकल अडचणींवर मात करण्याची क्षमता असलेले हे सारे तंत्रज्ञान आपल्याकडे काही संशोधकांच्या बुध्दीने घेतलेल्या अतीव श्रमांचे फलित म्हणून लवकरच पोहोचणार आहे.
हे सांगता सांगता दाश सरांनी आणखी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. भाष्य केले म्हणण्यापेक्षा ते सहज निर्मळपणे सांगत होते. पण ते सारे ऐकणाऱ्या मला भाष्य सुचत होते.
विक्रम साराभाईंनी रिसर्चर होण्यापेक्षा इन्व्हेंटर होणे महत्त्वाचे आहे हे मनावर ठसवल्यानंतर कामाला लागलेल्या मूठभर प्रज्ञावंतांपैकी डॉ. दाश एक.  ते सांगत होते, साराभाईंनी त्यांना सांगितलं- रिसर्चर हा अखेर चौकटीतल्या चौकटीतच फिरत रहातो. इन्व्हेंटरला चौकटीच्या बाहेरच जाऊन वेगळा मार्ग काढावा लागतो. त्यामुळे तो साऱ्या जगाला काहीतरी नवीन देतो. जगाचं जीवन सुधारतो. दाश आम्हाला सांगत होते- आपणही आपल्या विद्यार्थ्यांना आता हेच सांगितलं पाहिजे. (आपण आपल्या विषयाच्या वर्गात विद्यार्थीसंख्या कशी वाढेल हे पहाण्यासाठी त्यांना आपल्या कालबाह्य विषयाची महती फुगवून सांगू नये)
वेगळा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे-( निदान त्यांना नापास तरी करू नये)
आपल्यातले खरोखरचे उत्तम अध्यापक जे शिकवतात ते रेकॉर्ड करून सर्वदूर पोहोचवले तर शिक्षणाचा सगळा प्रश्न सुटेल (बोंबला! कुणालातरी उत्तम ठरवलं की मग बाकीच्या खोगीरभरतीने काय करायचं गड्या?)
दाश म्हणाले, आपल्याकडे शिक्षण सर्वदूर पोहोचायला पैसा कमी पडतो. या स्वस्त साधनांच्या सहाय्याने आणि जगभरातले उत्तमोत्तम शिक्षक त्यामार्फत विद्यार्थांपर्यंत आणून आपल्याला अगदी कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणं शक्य होईल. (आणि शिक्षकाची नोकरी मिळताच आमच्या खाजगी शिकवण्या, आमची शेतीवाडी सांभाळून नोकरी असं सारं झकास चाललंय तेही बोंबलणार की!)
दास म्हणाले आपल्याकडील शासकीय, शैक्षणिक संस्थांचा  एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपण लोवेस्ट कोटेशनच्या आधारावर साधने खरेदी करतो. ( लोवेस्ट कोटेशन- हायेस्ट कमिशन असा पूर्ण फंडा आहे साहेब) त्यामुळे आपण अनेकदा ऑब्सोलीट तंत्रज्ञान गळ्यात घेऊन बसतो. ते बदलायला हवं. ( खरेदी समित्यांवर, वित्त निर्णय घेणाऱ्या अनेकांना अद्ययावत् तंत्रज्ञानातील अनेक वस्तू म्हणजे- म्हणजे रे काय
भाऊ असा प्रश्न पडलेला असतो हे कुठे माहीतै आहे तुम्हाला, दाशसर! वीस वर्षांपूर्वी मला पोर्टेबल ओव्हरहेड प्रोजेक्टर हवा होता तेव्हाच्या आमच्या एका साहेबांनी विचारलं होतं- ते कांय असतं? मग दोन वर्षांनंतर मला स्लाइड प्रोजेक्टर हवा होता तेव्हा दुसरे साहेब आले होते ते म्हणाले- पण ते काय जे असेल त्याची खरंच गरज आहे कांय? मग आम्हाला एकदा प्रिंटर-कॉपियर-स्कॅनरची गरज भासली, तेव्हा बजेट कमिटीचे चेअरमन असलेले महोदय-जे नंतर क्रमाने प्रकुलगुरू पुढे कुलगुरू झाले- ते गोंधळून गेले आणि म्हणाले- बघू- पुढल्या वर्षी घेतलं तर नाही चालणार कां?)
मग दाशसर म्हणाले, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री सर्वांनी मला आपल्या शिक्षणक्षेत्राचा तांत्रिक कायापालट करण्याचं आव्हान दिलं आहे. आम्ही भारतीयांसाठी हा कॉम्प्युटर सध्या पस्तीस डॉलर्समध्ये देता येईल असा केला आहे. मला तो दहा डॉलर्सवर आणायचा आहे. असे स्वस्त तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या हातात असेल. आता त्याद्वारे चांगला कंटेन्ट पोहोचवण्याचे आव्हान तुम्ही स्वीकारायचे आहे.
(बोंबला) कंटेन्टच्या कमिटीवर कोण कोण घुसवायचं- तयारीला लागा मंडळी.

तरीही-
एक असा भारतीय- जो या देशात अनाथ म्हणून रस्त्यावर टाकून दिलेला... दाश दाम्पत्याने वाढवला आणि साराभाईंनी जोपासला... आज नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात प्रोफेसर एमिरेटस आहे. इन्व्हेंटर म्हणून त्याने आजवर करोडो डॉलर्स कमावले आहेत, लक्झुरी जेटचा मालक आहे-सत्तर वर्षाचा आहे. तरीही देशासाठी नवीन काही करू पहातो आहे... तो विद्यापीठात येऊन काहीतरी आत्मीयतेने सांगून गेला.
आशावाद जपून ठेवायला माणसाला एवढं पुरतं.
शिक्षणक्षेत्रातून साऱ्या सुमारपणाचा पराभव व्हायला किती काळ जाईल कोण जाणे...
पण तरीही आशा ठेवायला हरकत नाही