Showing posts with label हक्काच्या मार्कांसाठी.... Show all posts
Showing posts with label हक्काच्या मार्कांसाठी.... Show all posts

Thursday, August 12, 2010

किळसवाणा भिकारडेपणा

काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला.तिच्या परिचितांपैकी एका विद्यार्थ्याने लॉच्या पेपर्सपैकी एका पेपरचे रिव्हॅल्यूएशन करायला विद्यापीठाच्या परीक्षाविभागात अर्ज केला होता. त्यात त्याचे मार्क्स वाढण्याऐवजी कमी झाले. म्हणून त्याने पुन्हा अर्ज केला होता. ही तांत्रिक चूक होती. पण ती निस्तरली जात नव्हती. मी माझ्या विभागातील हेडक्लार्कला सोबत देऊन त्याला परीक्षा विभागात पाठवले होते. त्या बाई स्वतःच म्हणाल्या मदत करा म्हणून मी स्वतःच सांगून येते,नाहीतर आपले लोकं मुलांना उभंच करत नाहीत. त्यानंतर त्याचं काम झालं असेल असं आम्ही गृहीत धरलं.
काल मैत्रिणीने सांगितलं- परीक्षा विभागातून ते काम उगाचच खोळंबत होतं म्हणून त्या मुलाची आई इथे आली. तिची अवहेलना झाली ती इतकी की ती तिथेच रडू लागली. मग एकूण चार टेबलांवर प्रत्येकी पाचशे रुपये वाटले तेव्हा ती तयार असलेली फाइल बाहेर निघाली. फाइल हातात देताना पुन्हा एकदा देणाऱ्याने मंत्र जपला- कुछ द्येव ना... पुन्हा पाचशे रुपये दिले.
काहीही चूक नसलेला, सुधारणेची गरज नसलेला आपला कागद हलायला इतकावेळ आणि लाच द्यावी लागते तर- चूक असेल तेव्हाचा रेट काय असेल त्रैरासिक मांडा.
ही गोष्ट पकडून दिली जाऊ शकत नाही, केस होऊ शकत नाही, कारण लाच देणाऱ्या मुलानेही चूकच केली आहे. आपल्याला एखादी गोष्ट लवकर मिळणे गरजेचे आहे हे सांगितले की असले भिकारडे लोक आणखी गैरफायदा उकळतात.
आता सिक्स्थ पे कमिशनचे पगार चांगले झाले आहेत तरीही काही कर्मचाऱ्यांचा हा भिकारडेपणा संपत नाही. ही गोष्ट कुलगुरूंच्या कानावर घातली असता त्यांनी कारवाई करू या म्हणून तयारी दखवली, पण कशी करणार कारवाई... कुठल्या आधारावर...
पण मला खात्रीच आहे- हा मुलगा, जो कायद्याचा विद्यार्थी असून काम काढण्यासाठी आणि पुढे त्रास होईल या भीतीने लाच द्यायला तयार झाला,तो पुढे येऊन लाच मागणाऱ्या,घेणाऱ्या माणसांकडे बोटही दाखवणार नाही.शिवाय पुरावा नसेल तर सत्य हा पुरावा होऊ शकत नाही हे तर लोकशाही न्यायव्यवस्थेचे गमक आहे.
मागे एकदा एंजिनिएरिंग विषयात मास्टर्स करणाऱ्या तीन मुलींची केस माझ्याकडे अशीच ओळखीतून आली होती. त्यांच्या गाईडच्या प्रश्नाचा गुंता विद्यापीठाने आणि कॉलेजने मिळून केला होता. तेव्हा परीक्षा नियंत्रकांकडून त्यांना अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती.
एकंदरच आमचा परिक्षाविभाग संवेदनाहीन पध्दतीने वागतोच.
मला काही लोक म्हणाले, अहो मॅडम, तुम्ही काय या बारीकसारीक गोष्टीने व्यथित होताय... हे तर काहीच नाही.
कुलगुरूपदावरील व्यक्तीने आपण काय करू शकतो अशी हतबलता दर्शवली तर मग संपलंच.
आता तंत्रज्ञान पुढे गेलं आहे. त्याचा वापर करा, सर्वत्र सीसीटीव्ही बसवा. कारवाई करायची तर पुरावे मिळतील याची व्यवस्था करा.
आणि मुख्य म्हणजे आपण भिकारडेपणा करता आहात याची या संबंधित कर्मचाऱ्यांना थोडी जाणीव करून द्या. त्यांची लाज काढा.
भ्रष्टाचार केला तर गाढवावरून धिंड काढण्याची शिक्षा अंमलात आणली तर आमच्याकडे देशातली गाढवं कमी पडतील.
नाहीतर अँटीकरप्शनब्यूरोची एक चौकीच इथे बसवायला हवी.
विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षण प्रक्रियेच्या ऐन भरात असताना आमच्याकडूनच मुलांना भ्रष्ट होण्याचा पहिला धडा मिळतो. शरम वाटते. या विद्यापीठाच्या नावाने काम करण्याची शरम वाटावी असले हे भिकारडे आमच्या सोबत काम करतात. किळस तरी किती करावी?
विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना यांना हे दिसत नाही?