Friday, October 22, 2010

आशा करावी?

हास्यास्पद म्हणावे की करुणास्पद असा प्रश्न आहे.
आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर घराणेशाहीची झूल चढवण्यासाठी सच अ लॉन्ग जर्नी या पुस्तकाच्या विथड्रॉवलच्या खेळीचा उपयोग करून घेण्यात आला. दसऱ्याला युवराज्याभिषेक पार पडल्याने सेना परिवाराचे घोडे गंगेत न्हाले आहे. त्यांना त्यात तसा फारसा रस राहिला असण्याचे कारण नाही. पण बुध्दीजीवींच्या क्षेत्रात ढवळाढवळ केल्यानंतर थोडे कवित्व करावे लागणारच. त्यामुळे काही चॅनेल्सवर डबेवाल्या काकांची मुलाखत वगैरे वाजवण्यात आली. सामनानेही लिहिले की कसा यात डबेवाल्यांच्या अस्मितेवर वार करण्यात आला... वगैरे. (या कादंबरीतील एक मॅड बावा पात्र आपल्या ट्रेनच्या प्रवासातला एका डबेवाल्याच्या घामात भिजण्याचा अनुभव सांगते हा त्याचा संदर्भ.) या कादंबरीवर एकंदर अपात्र लोकांनी भरपूर चर्चा केली. असल्याच लोकांनी याचा इश्यू करून विद्यापीठात तोडफोड केली असती, मालमत्तेचे नुकसान केले असते या भीतीनेच केवळ कादंबरी मागे घेतली असेल तर ते बऱ्याच अंशी समजून घेण्यासारखे आहे. आम्हाला एकेक वस्तू मिळवण्यासाठी इतका त्रास पडतो, मान्यता आहे, टेंडर आहे, कोटेशन आहे, पर्चेस कमिटी आहे, टेबलाटेबलांवर अडून रहाणे आहे,चेक काढण्यासाठी विनवण्या आहेत... त्या वस्तू कोणी माथेफिरूंनी फोडूनबिडून टाकल्या तर आम्हाला चांगलेच वाईट वाटले असते.

रोहिंटन मिस्त्रींना काय त्याचे? कॅनडात बसून...

त्यामुळे विद्यापीठाची स्वायत्तता- ऍट व्हॉट कॉस्ट असा प्रश्न आम्हा कुणाला पडला तर समजून घ्यावे अशीच परिस्थिती आहे. अखेर हे पुस्तक सिलॅबसमध्ये काढल्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी, मित्रांनी वाचले हा एक साईड इफेक्ट किती महत्त्वाचा आहे पहा. (मी आणि माझ्या चार मित्रमैत्रिणींनी हे पुस्तक कधीही वाचायची सुतराम शक्यता नव्हती. ते काढून टाकण्याची मागणी होताच आम्ही सर्वांनी ते मिळवून वाचले, बा(ळा) उगवत्या सूर्या, लक्षात घे.)
यात शिव्या आहेत म्हणून ते विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणार नाही असे बाकी कोणीही सांगितले तर एक वेळ- जाऊ दे, जुनी बाळबोध माणसं आहेत- असं म्हणून ऐकून घेतलं असतं. बाळासाहेबांच्या पुत्रपौत्रांनी, सैनिकांनी हे म्हटले म्हणून प्रश्न पडला- हे हास्यास्पद म्हणावे की करूणास्पद?
आता या पुस्तकाच्या शिळ्या कढीला ऊत आणून आमच्या विद्यापीठात आणि विद्यापीठ परिघावर बुध्दीवादी राजकारणाचा वास परमाळतो आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोनदा अरूण टिकेकरांनी, मिररमध्ये एकदा शांता गोखले यांनी लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांना या इश्यूत आपली साधने परजून घ्यायची संधी दिसली आहे. तर विद्या'पिटा'तील काही संत(!) प्रवृत्तीच्या लोकांना आपसातले काही हिशेब चुकते करता येतील कां या संदर्भातील संधी दिसू लागल्या आहेत.
विद्यापीठात इंग्लिश विभागात असलेल्या प्रा.डॉ. निलूफर भरूचा या बोर्ड ऑफ स्टडीजवर होत्या त्या काळात त्यांच्या सूचनेवरून हे पुस्तक अभ्यासाला लावले होते आणि त्या भीतीने आता लपून बसल्या आहेत आणि परदेशी पळून गेल्या आहेत अशी बातमी आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये लागली आहे. ही बातमी विद्यापीठीय राजकारणाच्या गटारगंगेतल्याच कुणीतरी पेरली आहे हे निःसंशय.
प्रा. डॉ. निलूफर भरूचा या आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्यक्षेत्रात नामवंत विदुषी म्हणून प्रसिध्द आहेत. इथल्या अनेकांना हे कदाचित् माहीत नसेल, परंतु त्या नोबेल पारितोषिक समितीवरही होत्या, कॉमनवेल्थ पुरस्कार समितीवरही होत्या आणि आहेत. जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका या देशांतील विविध विद्यापीठांकडून त्यांना सातत्याने निमंत्रणे येत असतात. आपल्याला एखादे आमंत्रण मिळवायचे तर कितीतरी क्लृप्त्या कराव्या लागतात याची जाणीव असलेल्या, स्वतःच्या थिटेपणाची जाणीव असलेल्या त्यांच्याच क्षेत्रातील एखाद्या लिलिपुटला त्यांच्या उंचीचा मत्सर असणे स्वाभाविक आहे. लोकशाही तत्वांमुळे कमी क्षमता असूनही ज्यांना पदे मिळाली, संधी मिळाली असे अनेक लिलिपुट्स् संधीचा लाभ घेऊन खरोखरीच वाढण्यापेक्षा इतरांची उंची त्यांचे पाय कापून काढून कशी कमी करता येईल याचाच विचार करीत असतात हे काय आम्हाला माहीत नाही...
निलूफर भरूचा हे सारे नाटक घडत असताना कॅम्पसवर होत्या, रोज संध्याकाळी चालण्याचा व्यायाम घ्यायला जात होत्या ते काय त्या घाबरल्या होत्या म्हणून की काय... त्या जर्मनीला गेल्या आहेत ही बातमी छापवून आणण्यामागे कुहेतूच आहे. विद्यापीठात एक नियम(अनेक कायदे आणि नियम गाढव असतात तसाच) आहे- कुलगुरूंची परवानगी न घेता विद्यापीठातील कुणी अगदी हनीमूनला सुध्दा परदेशी जाऊ शकत नाही. याच नियमाचा गैरआग्रह धरून नकळत किंवा वैयक्तिक कामामुळे परदेशी गेलेल्या लोकांनाही त्रास देण्याचे कार्यक्रम विद्यापीठाच्या भूतकाळात अनेकदा पार पडले आहेत.
भरुचाबाई या कादंबरीच्या संदर्भात कुलगुरूंना काही गोष्टी स्पष्ट सांगून आल्याचे त्यांनीच स्वतः मला सांगितले होते. ही गोष्ट आणखी ज्यांना माहीत झाली अशाच कोणीतरी ही बातमी छापवून आणण्याचा उद्योग केला हे स्पष्ट आहे.
अर्थात्, डॉ. भरुचा यांनी माझ्या मते एक मोठी चूक केली आहे ती म्हणजे, या विषयासंबंधात त्यांनी आपली भूमिका सडेतोडपणे, जाहीरपणे मांडली नाही. आपल्याला काय करायचे आहे- या विद्यापीठासाठी आता काहीही करण्याची माझी इच्छा उरली नाही, बाकी कोणी बोलत नसताना मीच काय म्हणून बोलू वगैरे कारणांनी त्यांनी जाहीर भूमिका घेतली नाही. विद्यावंतांच्या निष्क्रीय सौजन्याचेच हे उदाहरण ठरते. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विदुषी म्हणून त्यांनी आपली भूमिका ठणकावून मांडणे महत्त्वाचे ठरले असते. जे टिकेकरांनी, शांता गोखल्यांनी लिहिले ते त्यांनी लिहिले असते, मांडले असते, तर या विद्यापीठाच्या स्वतंत्र अस्मितेची शान वाढली असती. अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्या कोषातून बाहेर पडून डॉ. भरूचांच्या क्षमतेच्या विद्यापीठातील विद्वानांनी आपली निष्ठा केवळ नोकरीशी नसून, उच्चपदस्थांशी नसून विद्येशी आणि निगडीत मूल्यांशी आहे हे दाखवून दिले पाहिजे.
या विषयाची चर्चा बातमी छापून येण्या अगोदर, विद्याक्षेत्रातील राजकारणाचे आणखी एक आगर म्हणजे एशियाटिक लायब्ररी येथे आधीच सुरू झाली होती असे माझ्या निदर्शनास आले आहे. ती चर्चा झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी बातमी छापून आली हेही पुरेसे बोलके आहे. कसले हे विद्याक्षेत्र- जेथे राजकारणक्षेत्रापेक्षा घाणेरडे आणि नीच राजकारण खेळले जाते.

तापल्या तव्यावर आपल्याही असूयेची पोळी भाजून घ्यायचा हा घाणेरडा प्रकार आहे.

दुसरी गोष्ट लिहायची आहे ती या सर्व विषयाबद्दल लिहिणाऱ्या अरूण टिकेकरांबद्दल. लोकसत्ताच्या संपादकपदी असताना सर्वकाळ बाळासाहेब ठाकऱ्यांवर टीका करण्याच्या भानगडीत पडणे टाळणाऱ्या टिकेकरांनी एकदम जोरदार पवित्रा घ्यावा हे निश्चितच गौरवास्पद आहे. विद्यापीठाचे इतिहासकार म्हणून त्यांनी या घटनेसंबंधी मत नोंदले हे महत्त्वाचे ठरते यात वादच नाही. पण सेनेपासून आपली चामडी आपणही वाचवत होतो हे विसरून, वेळूकरांनी स्वतःची चामडी वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांची चामडी मात्र तुम्ही तुमच्या लेखणीने लोळवणार हे कसे. वेळूकरांचे इंग्रजी तेवढेसे कसलेले नाही याचा उल्लेख - मी नागपूर विद्यापीठाचा अल्मा मॅटर आहे असे चुकीचे इंग्रजी ते बोलल्याचे लिहून त्यांच्याबद्दलच्या कुलगुरू म्हणून असलेल्या अपेक्षांच्या चिंधड्या उडाल्याचे ते लिहितात. भाषेवर प्रभुत्व नसले, किंवा साहित्य वाचन, व्यासंग कमी असला म्हणजे कुलगुरू काहीही करू शकणार नाही असे म्हणणे हे व्यवस्थापकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपली इतिहासकार-मती तोकडी असल्याचे लक्षण आहे. चारचौघात दुसऱ्याची चूक दाखवली म्हणजे आपण विद्वान ठरतो असे समजण्याची कोती वृत्ती असल्याचे लक्षण आहे.
सच अ लॉन्ग जर्नी हे पुस्तक विथड्रॉ करून नव्या कुलगुरूंनी एक चूक निश्चितच केली असे माझेही मत आहे. परंतु विद्यापीठात करण्यासारखी विद्यार्थीहिताच्या, प्रशासकीय सुधारणांची भरपूर कामे आहेत. ती जरी स्वच्छपणे केली तरी खूप. आणि विद्येशी निष्ठा दाखवणाऱ्या, भले आपल्याशी दुमत असलेल्या विद्वानांचा सन्मान ठेवला तरी खूप.
मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होतेच. सच अ लॉन्ग जर्नी ही काही फार मातब्बर लेखन असलेली कादंबरी मला वाटलीच नाही. त्या कांदबरीच्या भोवतीने पिंगा घालण्याचे तसे काहीच कारण नाही. त्यातील उतारे वाचून दाखवणे वगैरे फालतू ड्रामा अस्थानी आहे. पण आमच्या स्वतंत्र वृत्तीचा अधिक्षेप करण्यास कोणीही धजावू नये अशी काळजी आम्हा सर्वांसकट कुलगुरूंनी घेतलीच पाहिजे. एका चुकीवरून पुढचा धडा शिकणाराच मोठा होतो.
अजूनही आम्हाला आशा आहे....!

Saturday, October 16, 2010

एका सत्यवादीचे पत्र

कॅलिफोर्निया विद्यापीठामधील भौतिकशास्त्राचे प्रोफेसर एमिरेटस असलेले, अमेरिकन विज्ञान-तंत्रज्ञान जगतात अनेक प्रकारे महत्त्वाच्या भूमिका बजावलेले प्रा. डॉ. हेरॉल्ड लुविस यांनी नुकताच अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र मोठे वाचनीय आहे. सध्याच्या मानवनिर्मित वातावरण बदल आणि जागतिक तापमानवृध्दीच्या सद्दीच्या काळात तथाकथित कन्सेन्ससचा बोलबाला एवढा असताना असले पत्र एखाद्या वैज्ञानिकाने लिहिले आहे हे लोकांच्या नजरेस आणून देणे मला महत्त्वाचे वाटते.
डॉ. लुविसचे पत्र विज्ञानाच्या सर्व पाईकांनाच नव्हे तर ज्ञान आणि सत्याशी निष्ठा असलेल्या सर्वच क्षेत्रांतील लोकांना मननीय वाटेल. त्या पत्राचा अनुवाद पुढे देत आहे.

- प्रिय कर्ट,

सदुसष्ट वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रथम अमेरिकन फिजिकल सोसायटीचा सदस्य झालो तेव्हा ती अगदी छोटीशी, सौम्य संघटना होती- तोपर्यंत पैशाच्या महापुरात न्हाऊन भ्रष्ट झालेली नव्हती. ड्वाईट आयझेन हॉवरने अर्धशतकापूर्वी आपल्याला या धोक्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तर भौतिकशास्त्र हा विषय निवडून आयुष्याचा मार्गक्रम ठरवणे म्हणजे दारिद्र्याचा, सततच्या अभावाचा वसा घेतल्याचेच लक्षण ठरत होते. दुसऱ्या महायुध्दानंतर हे सारे बदलले. त्यानंतर चांगले उपजीविकेचे साधन मिळवण्याचा एक मार्ग म्हणून अनेकजण भौतिकशास्त्राच्या अभ्यासात शिरले. अगदी अलिकडे, म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी विज्ञान आणि समाजातील एक सामाईक चिंतेचा विषय म्हणून अणुभट्टीच्या सुरक्षा अभ्यासासाठी स्थापन झालेल्या अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या समितीचा मी अध्यक्ष होतो तेव्हाही, बाहेर या विषयावरून झोंडगिरी करणारे अनेक लोक होते, पण आम्हा भौतिकशास्त्रज्ञांवर प्रमाणाबाहेर दबाव पडण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे जी परिस्थिती आहे तिचे वैज्ञानिक निकषांवर प्रामाणिकपणे मूल्यांकन करणे आम्हाला शक्य झाले. आमच्या कामात काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालेच तर ते तपासून पहायला आणखी एक ओव्हरसाइट कमिटी होती. त्यात असलेले पिएफ पानोफ्स्की, व्हिकी वाइसकॉफ, आणि हॅन्स बेथ यांच्यासारखे उत्तुंग भौतिकशास्त्रज्ञ आमच्या कामात सहाय्यभूत होते. एका भारलेल्या वातावरणात आम्ही जे काम पार पाडले त्याचा मला अतिशय अभिमान वाटला होता. एपीएसच्या अध्यक्षांना दिलेल्या अहवालात ओव्हरसाइट कमिटीने आम्ही ज्या स्वतंत्र बाण्याने काम केले त्याची नोंद घेतली होती. या अहवालावर दोन्ही बाजूंकडून टीका होईल असेही त्यांनी म्हटले होते. यापेक्षा मोठा गौरव कोणता असणार?
आज किती वेगळे चित्र दिसते आहे. असे उत्तुंग मानव या पृथ्वीवर वावरतच नाहीत, आणि पैशाचा महापूर हेच साऱ्या भौतिक-संशोधनाचे, इतर अनेक गोष्टींचे आणि अनगिनत व्यावसायिक नोकऱ्यांचे उगमस्थान ठरते आहे. मी माझी कारणे स्पष्ट करतोच आहे, त्या कारणांमुळे एपीएसचा फेलो असण्यातला माझा इतके वर्षांचा अभिमान आता गळून जाऊन त्याची जागा शरमेने घेतली आहे. मला यात यत्किंचितही आनंद नाही, पण आणि मला या सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा तुझ्याकडे पाठवून देणे भाग आहे.
आज इतके सारे वैज्ञानिक भ्रष्ट होण्यास आणि एपीएससुध्दा ज्या लाटेत वाहवली आहे त्याला कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग स्कॅम आणि त्याला पाठबळ देणारा अक्षरशः अब्जावधी डॉलर्सचा महापूर. भौतिकशास्त्रज्ञ म्हणून मी प्रदीर्घकाळ काम केले आहे, त्यात पाहिलेला असला स्यूडोसायन्टिफिक- (छद्मवैज्ञानिक) बनाव केवळ एकमेवाद्वितीय असाच म्हणेन. आणि त्याला केवढे प्रचंड यश मिळाले आहे... ज्या कुणाला याबद्दल थोडीजरी शंका असे त्याने मांडी ठोकून क्लायमेटगेटची सर्व कागदपत्रे वाचायलाच हवीत. सारे काही उघड होते. मॉन्टफोर्डच्या पुस्तकात सारे काही संगतवार मांडलेले आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की कोणताही सच्चा भौतिकशास्त्रज्ञ- नव्हे तर कोणताही सच्चा वैज्ञानिक हे वाचून घृणेने भरून जाईल. मी तर वैज्ञानिकांची नवी व्याख्याच या घृणेच्या आधारे करू शकेन.
मग या आव्हानाच्या संदर्भात एपीएसने काय केले आहे? त्यांनी हा भ्रष्टाचार सर्वसाधारण मूल्य म्हणून मान्य करून टाकला आहे. उदाहरणार्थ-
1- साधारण एक वर्षापूर्वी आमच्यपैकी काही जणांनी काही सदस्यांना या विषयावर एक इमेल पाठवली. एपीएसने त्यात छेडलेल्या विषयांकडे दुर्लक्ष केले, पण एपीएसच्या अध्यक्षांनी आम्ही हे इमेल पत्ते कुठून मिळवले याची कुटील चौकशी सुरू केली. पूर्वी, एपीएस अशा महत्त्वाच्या विषयांवर सदस्यांनी आपापसात चर्चा करावी म्हणून उत्तेजन देत असे. किंबहुना सोसायटीच्या घटनेत हा एक प्रमुख हेतू मानला गेला आहे. आता नाही. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते चर्चा बंद व्हावी याच दृष्टीने करण्यात आले होते.
2- अनेकांचा विरोध असूनही क्लायमेट चेंजच्या बाजूने जे विधान एपीएसने प्रसृत केले ते अत्यंत घाईघाईने, मोजक्या लोकांना लंचला बोलावून लिहून टाकलेले होते. मी अनेक सदस्यांना ओळखतो, त्यांच्याशी बोलतो, अशा एपीएसच्या सदस्यांच्या विचक्षणेचे त्यात कुठेही प्रतिबिंब नाही. त्यातील काही जणांनी कौन्सिलकडे या मतप्रदर्शनाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. या मतप्रदर्शनातील एक अगदी (अव)लक्षणीय शब्द होता- विज्ञानाच्या दृष्टीने विषारीच- वादातीत सत्य. हा शब्द भौतिकशास्त्रातील अत्यंत नेमक्या बाबींना लागू होतो. या विषयाला तर नक्कीच नाही. ही मागणी होताच एपीएसने एका गुप्त समितीची स्थापना केली. तिची बैठक कधीच झाली नाही, त्यांनी या भूमिकेच्या विरुध्द असलेल्या स्केप्टिक्सना बोलावून कधीही चर्चा केली नाही- आणि तरीही आधीचे विधान संपूर्णतः योग्य असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. त्या विधानाचा सूर जरा नको इतका तीव्र आहे एवढेच त्यांनी मान्य केले. कुणाचाही आग्रह नसताना वादातीत सत्य हा शब्दही पुराव्यांच्या संदर्भात तसाच ठेवला. अखेरीस, कौन्सिलने संपूर्ण विधान होते तसेच ठेवले केवळ त्यात काही अनिश्चितता असल्याचे नमूद केले आणि मग त्या अनिश्चितता मागे सारून मुख्य विधानाला सरसकट मान्यता देण्यासाठी शब्दबंबाळ स्पष्टीकरणांची भर घातली. ते विधान अजूनही एपीएसची अधिकृत भूमिका म्हणून तसेच विराजमान आहे. त्यात जगभरातील सर्व शासनांना दिलेला सल्ला एपीएसचा बडेजाव माजवणारा आहेच पण गाढवपणाचाही आहे... जणू काही एपीएस म्हणजे कोणी विश्वनियंता आहे- मास्टर ऑफ द युनिव्हर्स. असे नाही... आणि आपली नेते मंडळी असे मानतात याची मला लाजच वाटते. हा काही करमणुकीचा खेळ नाही. आपल्या राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न यात गुंतलेला आहे, वैज्ञानिकांची संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा कसोटीला लागते आहे.
3- आणि मग दरम्यान क्लायमेटगेट घोटाळा बातम्यांतून चव्हाट्यावर आला. प्रमुख भयकंपवाद्यांची कारस्थाने जगापुढे आली. एवढ्या प्रचंड प्रमाणावरचा वैज्ञानिक घोटाळा मी कधी पाहिला नव्हता आणि त्याचे वर्णन करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत. एपीएसच्या भूमिकेवर याच काही परिणाम दिसावा- काहीही नाही. काहीच नाही. हे विज्ञान निश्चितच नाही. काही वेगळ्याच शक्ती यात कार्यरत आहेत.
4- मग आम्ही काही जणांनी या मध्ये थोडा वैज्ञानिक विचार पुन्हा जागवण्याचा प्रयत्न केला... कारण अखेर एपीएसचा कथित आणि ऐतिहासिक हेतू तोच तर आहे. आम्ही आवश्यक त्या- म्हणजे 200 हून अधिक सह्या गोळा केल्या आणि कौन्सिलने क्लायमेट सायन्सवर, त्यातील वैज्ञानिक मुद्द्यावर खुली चर्चा करण्यासाठी टॉपिकल ग्रुप करावा अशा प्रस्ताव ठेवला. यामुळे भौतिकशास्त्रातील खुल्या चर्चेची गौरवशाली परंपरा जपली जणार होती, राष्ट्राच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे योगदान ठरले असते. तुम्ही आम्हाला एपीएसच्या सदस्यांची यादी देण्यास नकार दिल्यामुळे या 200 सह्या गोळा करणं जरा अवघड गेलं हे मी नमूद करू इच्छितो. एपीएसच्या घटनेनुसार सर्व नियमांची परिपूर्ती करून, आमचा हेतू विस्ताराने स्पष्ट करून हा विषय खुल्या चर्चेसाठी यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले.
5- आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, घटना गेली खड्ड्यात, तुम्ही आमचा अर्ज स्वीकारायलाच नकार दिलात. त्याऐवजी स्वतःच्या ताब्यात असलेल्या पत्त्यांच्या जोरावर क्लायमेट चेंज आणि पर्यावरणावरील टॉपिकल ग्रुपमध्ये सदस्यांना किती रस आहे याची पडताळणी करण्याचा तुम्ही सुरुवात केलीत. विषय न देता असा ग्रुप करण्याचा प्रस्ताव करण्यात किती जणांना रस आहे असे तुम्ही विचारलेत. तरीही अनेकांनी होकार दिला.(तुम्ही सेक्सबद्दल विचारणा केली असती तर तुम्हाला अधिकच प्रतिसाद मिळाला असता) अर्थातच पुढे असे काहीही झाले नाही. त्यानंतर तुम्ही पर्यावरणाचा भागच वगळलात आणि आता सारे प्रकरण ठप्प आहे. एखादा साधा वकीलही तुम्हाला सांगेल की विषय स्पष्ट न करता अर्जी भरली आणि नंतर रिकाम्या जागा भरू म्हणून सांगितले तर त्यावर कोणीही सह्या करीत नाही. हे सारे करण्यामागचा तुमचा एकच हेतू होता, तो म्हणजे आमचा प्रस्ताव कौन्सिलपुढे नेण्याची घटनात्मक जबाबदारी टाळणे.
6- आमच्या कायदेशीर विनंतीकडे दुर्लक्ष करून स्वतःचा टॉपिकल ग्रुप करण्यासाठी आता तुम्ही आणखी एक गुप्त आणि निष्क्रीय समिती स्थापन करून ठेवली आहे.

क्लायमेट चेंजच्या संदर्भात केलेले दावे तावून सुलाखून घेण्याच्या दृष्टीने काहीही गंभीर स्वरूपाची अभ्यस्त चर्चा घडूच नये म्हणून एपीएसच्या व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच हा प्रश्न झुलवत ठेवला आहे. या संघटनेवरील माझा विश्वास उडाला याचे तुला नवल वाटते कां?
इथे मला एक गोष्ट मुद्दाम नोंदून ठेवण्याची गरज वाटते, कारण इतरांच्या अंतस्थ हेतूंची चर्चा करण्यात जरा धोकाच असतो. एपीएसमधील ही कारस्थाने इतकी विचित्र वाटतात की त्याचे सरळसोपे स्पष्टीकरण देणे कठीण आहे. कुणी म्हणतात, आजकालचे भौतिकशास्त्रज्ञ पूर्वीच्यांइतके हुषार नाहीत, पण तसे काही मला वाटत नाही. मला वाटते, अर्धशतकापूर्वी आयझेनहॉवरने म्हटल्याप्रमाणे, याचे मूळ कारण पैसा हेच आहे... या विषयात अब्जावधी डॉलर्सच्या सोबतीनेच प्रसिध्दी आणि चकचकाटही आहे. शिवाय सुंदर, निसर्गरम्य बेटांना भेटी देण्याची संधीही या क्लबच्या सदस्यांना सहजच चालून येते. जर ग्लोबल वॉर्मिंगचा फुगा अचानक फुटला तर, तू अध्यक्ष असलेला तुझा स्वतःचा भौतिकशास्त्र विभाग वर्षाकाठी काही दशलक्ष डॉलर्सना मुकेल. माइक मानच्या गैरवैज्ञानिक वर्तणुकीला माफी देताना पेनसिल्वेनिया स्टेट विद्यापीठाने किंवा फिल जोन्सला माफ करून टाकणाऱ्या इस्ट अँग्लिया विद्यापीठाने या गोष्टींचा विचार केला असणारच. वेगळा निर्णय घेतला असता तर त्याचा आर्थिक भुर्दंड किती पडला असता याचे त्यांना भान नव्हते थोडेच. जुनी म्हण आहे आपली- वारा कुठल्या दिशेने वाहतो हे कळायला तुम्ही काही हवामानतज्ज्ञ असण्याची गरज नसते.
मी काही तत्वज्ञानी नाही, त्यामुळे आपला बृहद्स्वार्थ साधण्याची आंस आणि भ्रष्टाचार यातील अंतर कुठे ओलांडले जाते याचा काही मी विश्लेषक होऊ शकत नाही, पण क्लायमेटगेटबद्दल जी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत ती वाचून एवढे तर निश्चितच स्पष्ट होते की आता या विषयाचे स्वरुप ऍकेडेमिक राहिलेले नाही.
मला यात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायचे नाही, त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार. आशा आहे की आपण अजूनही मित्र आहोत.

हॅल

हे पत्र वाचल्यानंतर, आपल्या जगाची काळजी वाटणाऱ्या, आणि त्या दृष्टीने जबाबदार वर्तन करण्याची गरज वाटणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्रातील सर्वच प्रचाराबाबत बुध्दीच्या निकषांवर विचार करावा अशी इच्छा व्हावी. पैशाच्या महापुरात वाहून जाणे ही भ्रष्टता असेल पण भावनेच्या महापुरात तर्कबुध्दी गमावणे ही त्यापेक्षाही महाग पडणारी चूक ठरू शकेल.

Friday, October 15, 2010

अभिनंदन

झेवियर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्यांचे अभिनंदन.
सच अ लॉन्ग जर्नी हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याच्या निर्णयाला या विद्यार्थांनी आणि प्राचार्य मस्करेन्हास यांनी आव्हान दिले आहे याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
झेवियर्स महाविद्यालयाकडे स्वायत्तता आहे आणि त्यांनी त्याचा योग्य उपयोग करावा हे सुचिन्ह आहे.
विद्यापीठातील मानभावी विद्वानांनी काही तरी धडा घ्यावा.

Tuesday, October 12, 2010

अविद्येची लॉन्ग जर्नी

बऱ्याच दिवसांत माझे विद्यापीठचा ब्लॉग लिहिला नव्हता. मध्यंतरीच्या काळात सच अ लॉन्ग जर्नी या रोहिन्टन मिस्त्रींच्या पुस्तकावरून नव्या कुलगुरूंनी शिवसेनेच्या दबावापुढे नमतं घेऊन ते ताबडतोब, तडकाफडकी अभ्यासक्रमातून वगळलं म्हणून विद्यापीठाबद्दल, कुलगुरूंबद्दल बातम्या छापून आल्या. अशा पध्दतीने पुस्तक वगळल्याबद्दल विद्वत्क्षेत्रात केवळ अरूण टिकेकरांनीच तेवढा टाईम्स ऑफ इंडियामधून लेख लिहिला. दुसऱ्याच दिवशी आयबीएन लोकमतच्या चॅनेलवर त्याबद्दल चर्चा झाली.
त्यात भाग घेणाऱ्यांत विद्यापीठातील इंग्लिश विभागाचे कोणीच नव्हते.
विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अशा प्रकारे पुढाकार घेऊन एक पुस्तक अचानक अभ्यासक्रमातून मागे घ्यावे हा खरोखरच चुकीचा निर्णय होता. त्याबद्दल अर्थातच सर्वत्र चर्चा होती. पण शिवसेनेच्या गुंडगिरीचे भय सर्वांच्याच मनात इतके घट्ट आहे की त्यापेक्षा होते आहे ते होऊ दे असाच पवित्रा सर्वांनी घेतला. यात विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान होईल, आपल्याला घेराव, मारहाण वगैरे होईल ही भीती होतीच.
शिवाय अनुनयात्मक निर्णय कुलगुरूंनी घेतलेला असल्याने आपण केवळ गप्प बसायचे पण खाजगीत मात्र त्यांच्या अपरिपक्वतेबद्दल, नेभळटपणाबद्दल, अविद्वत् वर्तणुकीबद्दल चर्चा करायची. एवढे करून आम्हाला आमची इंटेलेक्चुऍलिटीची झूल कशी मस्त अबाधित पांघरता आली.
बोर्ड ऑफ स्टडीज्च्या ज्या सदस्यांनी हे पुस्तक अभ्यासक्रमास लावले होते त्यापैकी एकही व्यक्ती त्याच्या बाजूने ठामपणे उभी रहायला धजावली नाही. ते काम नव्या कुलगुरूंनी करायला हवे होते ही त्यांची अपेक्षा होती. ती रास्तच होती. पण त्यांनी स्वतःच्या बुध्दीची, अभिव्यक्ती स्वातंत्र्यनिष्ठेची प्रखरता शिवसेनेच्या समोर सोडा नव्या कुलगुरूंच्या समोर तरी दाखवून दिली कां याचे उत्तर दुर्दैवाने नकारात्मक होते.
नवे कुलगुरू आधीच अदासावंतांच्या अदावतीमुळे आणि अदालतबाजीमुळे जरा अडचणीतच आहेत. त्यांना हे नवीन झेंगट नकोच वाटले असणार. तरीही अशा कसोटीच्या प्रसंगीच कसोटीला उतरण्याची गरज असते हे त्यांनी आता तरी लक्षात ठेवावे. आणि अखेर भिऊन घाबरून काय झाले... शिवसेनेला सांभाळले, त्यांच्या उगवत्या सूर्याला सांभाळले आणि त्यांना 'पदो'पदी ज्यांचा आधार लागेल त्या सत्ताधारी पक्षांच्या लोकांची जोरदार टीका- जाहीर टीका त्यांनी ओढवून घेतली आहे.
मुंबई विद्यापीठात ही कादंबरी ती 2007पासून बीएच्या अभ्यासासाठी लावलेली होती आणि आत्ता त्या सिलॅबसचे अखेरचे वर्ष, अखेरच्या टप्प्यात होते. 1991साली प्रसिध्द झालेली, विदेशात आणि भारतीय विद्वत्-क्षेत्रात गाजलेली ही कादंबरी अचानक आत्ता आक्षेपार्ह कां ठरली?
आमच्या काही भो भो संस्कृतीरक्षक, मर्यादित वाचन आणि मर्यादित बौध्दिक आवाका असलेल्या मित्रांना शिव्यायुक्त वाङ्मय म्हणजे नाके मुरडण्यासारखेच वाटते.
बाळासाहेब ठाकरेंना त्यात शिव्या घातल्या आहेत हे निमित्त करून शिवसेनेच्या एखाद्या तरूण नेत्याला यात स्वतःला मोठं करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी हा इश्यू उचलला हे आपल्या या गचाळ राजकीय-सामाजिक संस्कृतीत अगदी अपेक्षित आणि समजून घेण्यासारखेच, साजेसेच आहे.
बोर्ड ऑफ स्टडीज् मधलं स्थान आणि राजकारण हा शैक्षणिक कर्तबगारीचा सर्वोच्चबिंदू मानणाऱ्या काही ऍक्टिव्ह ऍकेडेमिशियन्सकडूनसुध्दा हीच अपेक्षा होती. या कादंबरीत अशा शिव्या आहेत- काय हे... काय हे... शांतम् पापम् वगैरे रान उठवण्याची सुरुवात असल्याच एका शिक्षकाने केली.
ज्या प्रकारच्या लोकांनी हा इश्यू उचलला, त्यांची नैतिकता आणि बुध्दी यांच्या मर्यादा आपल्याला माहीत आहेत. स्वाभाविकच विकतचे दुखणे कोणालाही नको. आम्ही ऍकेडेमिक्स तर बोटचेपेपणात नंबर एक. आम्ही कणखरपणे उभे रहाणार? झालंच!
आम्हाला कधी प्रॉपर्टीचे नुकसान होण्याची भीती वाटणार, कधी आपल्यावर कोणी हल्ला करेल याची, कधी आपल्या तोंडाला कुणी काळं फासेल याची...
आपल्याला सेन्सॉरशिप नको... अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे. पण सारे कसे सहज अलगद तोंडात साखरभरला गुलाबजाम पडावा तसे. आपल्याला विचार प्रवर्तक लेखन हवे, पण त्याच्या संरक्षणासाठी आपण बोटही वर करणार नाही. लागलीच गुडघे टेकून पुस्तक विथड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात सारेच पुढे. कोणीही हुं म्हणायला तयार नाही. वैचारिकतेचा बळी पडला तरी चालेल, आपण आपले सुरक्षित राहिलो म्हणजे झाले.
बुकर अवॉर्डसाठी नामांकन झालेली आणि कॉमनवेल्थ अवॉर्ड मिळालेली ही कादंबरी. भारतीय वंशाच्या, आता कॅनेडीयन नागरिक असलेल्या लेखकाने लिहिलेली पुरस्कारप्राप्त कादंबरी म्हणून ती मुंबई विद्यापीठातच लावली होती असे नव्हे तर इतर पाचसहा भारतीय विद्यापीठांतही बीए, एमएच्या इंग्रजी साहित्याच्या अभ्यासासाठी लावलेली आहे..

काही विद्यार्थी भेटले. त्यांनी सांगितलं की त्या कादंबरीतल्या शिव्यांचा विचारही करावा लागत नाही. आपण कादंबरीच्या विषयाचाच विचार करतो. कादंबरी तशी चांगलीच आहे... पण आम्ही बोलत नाही तर विद्यार्थ्यांनी बोलायची हिंमत दाखवावी ही अपेक्षा आम्ही कुठे करावी...
या साऱ्या निमित्ताने उत्सुकता वाटून ही कादंबरी मी वाचून काढली.
साठ -सत्तर- ऐंशीच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर, पारशी समाजाच्या पात्रांच्या, नायकाच्या दिनक्रमांतून, संवादांतून घडत गेलेली ही कादंबरी आहे. आपणच काय पारशी लोक स्वतःला सुध्दा मॅड बावा किंवा मॅड बावी म्हणवून घेत असतात. आणि जे पटेल ते धश्चोटपणे बोलून टाकायचं हा त्यांचा गुण साधारणतः कॉमन आहेच. कुणालाही साला, साली, बास्टर्ड, रास्कल आणि अनेक असल्या शिव्या ते प्रेमात असतानाही देतात आणि संतापले तरीही देतात. त्यात त्यांना काही फारसे वावगे वाटत नाही. या कादंबरीतील पात्रे त्यांच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, ठाकरे आणि अशा अनेकांवर शिव्या घालत बोलतात. हा त्यांच्या संवादशैलीचा भाग आहे.
ही कादंबरी एका विशिष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून विशिष्ट कालखंडाची दखल आणि सेक्युलर विचारांवरील भाष्य या दृष्टीने महत्त्वाची आहे.
बांगला देशच्या लढाईच्या वेळी सॅम नगरवाला प्रकरण गाजलं होतं. आताच्या विद्यार्थ्यांना आणि या पुस्तकाला विरोध करणाऱ्या कुणालाही त्याची आठवण तरी असेल की नाही कोण जाणे. त्यावेळी जे काही घडलं त्यात संशयाची सुई इंदिरा गांधीकडे सरळ पॉइंट करीत होती. त्या एका सत्यघटनेचा वरवरचा संदर्भ घेऊन ढोबळ पारशी व्यक्तीरेखा घेऊन लिहिलेली ही कादंबरी मला स्वतःला सुरुवातीला बरी वाटली ती एका वेगळ्या समाजाचे चित्रण असल्यामुळे. उत्तरार्धानंतर मात्र ती ढासळत जाते. नायकाच्या कौटुंबिक कथा आणि व्यथा आणि सॅम नगरवालाशी साधर्म्य असलेली मेजर बिलिमोरियाची कथा यातल्या कशालाच नेमकेपणा येत नाही. सेक्युलर भिंतीच्या कथेचीही तीच तऱ्हा. लेखकाला तसे म्हणायचे नसले तरीही, नायकाच्या कुटुंबियांवर ओढवलेले प्रसंग जादूटोणा- प्रार्थना वगैरेंच्या माध्यमातून सुटल्याचे भासते, हा माझा स्वतःचा या कादंबरीवरचा आक्षेप.
फार काही थोर नसलेली ही जरा वेगळ्या पार्श्वभूमीवरची, वेगळ्या वातावरणातली कादंबरी एसवायच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लावली तर त्यात फार काही विशेष नव्हते. असेही आणि तसेही.
खरे म्हणजे जिच्यासाठी धडधडून आग्रह धरावा असे काही मूल्य या कादंबरीत नाही. माझ्या दोन विद्वान पारशी दोस्तांनी तर ती कादंबरी अगदीच सो सो आहे , तिला विरोध तरी कशाला एवढा... म्हणून विषय गुंडाळून टाकला.
पुस्तकाची म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण गुंडगिरीचा काळ विद्यापीठात सोकावला हे नक्की.
आणि विद्यापीठीय विद्वान अगदी सहज बकाबका मूग गिळून बसतात यावरही शिक्कामोर्तब झालं.
विरोध करणारेही राजकारणी, कादंबरी विथड्रॉ केली म्हणून टीका करणारेही राजकारणीच.
पत्रकारितेचे संरक्षक कवच पेहेनलेल्या दोन-तीन विद्वानांनी निषेध नोंदवला. विद्यापीठाच्या इंग्लिश विभागाच्या कुणी नव्हे तर राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. उत्तरा सहस्रबुध्दे यांनी आयबीएन् लोकमतवर निसंदिग्धपणे ही कृती चुकीची असल्याचा बाईट दिला.
तेवढं सोडलं तर आमची लक्तरं दिसतंच आहेत.