Friday, October 22, 2010

आशा करावी?

हास्यास्पद म्हणावे की करुणास्पद असा प्रश्न आहे.
आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर घराणेशाहीची झूल चढवण्यासाठी सच अ लॉन्ग जर्नी या पुस्तकाच्या विथड्रॉवलच्या खेळीचा उपयोग करून घेण्यात आला. दसऱ्याला युवराज्याभिषेक पार पडल्याने सेना परिवाराचे घोडे गंगेत न्हाले आहे. त्यांना त्यात तसा फारसा रस राहिला असण्याचे कारण नाही. पण बुध्दीजीवींच्या क्षेत्रात ढवळाढवळ केल्यानंतर थोडे कवित्व करावे लागणारच. त्यामुळे काही चॅनेल्सवर डबेवाल्या काकांची मुलाखत वगैरे वाजवण्यात आली. सामनानेही लिहिले की कसा यात डबेवाल्यांच्या अस्मितेवर वार करण्यात आला... वगैरे. (या कादंबरीतील एक मॅड बावा पात्र आपल्या ट्रेनच्या प्रवासातला एका डबेवाल्याच्या घामात भिजण्याचा अनुभव सांगते हा त्याचा संदर्भ.) या कादंबरीवर एकंदर अपात्र लोकांनी भरपूर चर्चा केली. असल्याच लोकांनी याचा इश्यू करून विद्यापीठात तोडफोड केली असती, मालमत्तेचे नुकसान केले असते या भीतीनेच केवळ कादंबरी मागे घेतली असेल तर ते बऱ्याच अंशी समजून घेण्यासारखे आहे. आम्हाला एकेक वस्तू मिळवण्यासाठी इतका त्रास पडतो, मान्यता आहे, टेंडर आहे, कोटेशन आहे, पर्चेस कमिटी आहे, टेबलाटेबलांवर अडून रहाणे आहे,चेक काढण्यासाठी विनवण्या आहेत... त्या वस्तू कोणी माथेफिरूंनी फोडूनबिडून टाकल्या तर आम्हाला चांगलेच वाईट वाटले असते.

रोहिंटन मिस्त्रींना काय त्याचे? कॅनडात बसून...

त्यामुळे विद्यापीठाची स्वायत्तता- ऍट व्हॉट कॉस्ट असा प्रश्न आम्हा कुणाला पडला तर समजून घ्यावे अशीच परिस्थिती आहे. अखेर हे पुस्तक सिलॅबसमध्ये काढल्यामुळे खूप विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी, मित्रांनी वाचले हा एक साईड इफेक्ट किती महत्त्वाचा आहे पहा. (मी आणि माझ्या चार मित्रमैत्रिणींनी हे पुस्तक कधीही वाचायची सुतराम शक्यता नव्हती. ते काढून टाकण्याची मागणी होताच आम्ही सर्वांनी ते मिळवून वाचले, बा(ळा) उगवत्या सूर्या, लक्षात घे.)
यात शिव्या आहेत म्हणून ते विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणार नाही असे बाकी कोणीही सांगितले तर एक वेळ- जाऊ दे, जुनी बाळबोध माणसं आहेत- असं म्हणून ऐकून घेतलं असतं. बाळासाहेबांच्या पुत्रपौत्रांनी, सैनिकांनी हे म्हटले म्हणून प्रश्न पडला- हे हास्यास्पद म्हणावे की करूणास्पद?
आता या पुस्तकाच्या शिळ्या कढीला ऊत आणून आमच्या विद्यापीठात आणि विद्यापीठ परिघावर बुध्दीवादी राजकारणाचा वास परमाळतो आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दोनदा अरूण टिकेकरांनी, मिररमध्ये एकदा शांता गोखले यांनी लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांना या इश्यूत आपली साधने परजून घ्यायची संधी दिसली आहे. तर विद्या'पिटा'तील काही संत(!) प्रवृत्तीच्या लोकांना आपसातले काही हिशेब चुकते करता येतील कां या संदर्भातील संधी दिसू लागल्या आहेत.
विद्यापीठात इंग्लिश विभागात असलेल्या प्रा.डॉ. निलूफर भरूचा या बोर्ड ऑफ स्टडीजवर होत्या त्या काळात त्यांच्या सूचनेवरून हे पुस्तक अभ्यासाला लावले होते आणि त्या भीतीने आता लपून बसल्या आहेत आणि परदेशी पळून गेल्या आहेत अशी बातमी आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये लागली आहे. ही बातमी विद्यापीठीय राजकारणाच्या गटारगंगेतल्याच कुणीतरी पेरली आहे हे निःसंशय.
प्रा. डॉ. निलूफर भरूचा या आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्यक्षेत्रात नामवंत विदुषी म्हणून प्रसिध्द आहेत. इथल्या अनेकांना हे कदाचित् माहीत नसेल, परंतु त्या नोबेल पारितोषिक समितीवरही होत्या, कॉमनवेल्थ पुरस्कार समितीवरही होत्या आणि आहेत. जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका या देशांतील विविध विद्यापीठांकडून त्यांना सातत्याने निमंत्रणे येत असतात. आपल्याला एखादे आमंत्रण मिळवायचे तर कितीतरी क्लृप्त्या कराव्या लागतात याची जाणीव असलेल्या, स्वतःच्या थिटेपणाची जाणीव असलेल्या त्यांच्याच क्षेत्रातील एखाद्या लिलिपुटला त्यांच्या उंचीचा मत्सर असणे स्वाभाविक आहे. लोकशाही तत्वांमुळे कमी क्षमता असूनही ज्यांना पदे मिळाली, संधी मिळाली असे अनेक लिलिपुट्स् संधीचा लाभ घेऊन खरोखरीच वाढण्यापेक्षा इतरांची उंची त्यांचे पाय कापून काढून कशी कमी करता येईल याचाच विचार करीत असतात हे काय आम्हाला माहीत नाही...
निलूफर भरूचा हे सारे नाटक घडत असताना कॅम्पसवर होत्या, रोज संध्याकाळी चालण्याचा व्यायाम घ्यायला जात होत्या ते काय त्या घाबरल्या होत्या म्हणून की काय... त्या जर्मनीला गेल्या आहेत ही बातमी छापवून आणण्यामागे कुहेतूच आहे. विद्यापीठात एक नियम(अनेक कायदे आणि नियम गाढव असतात तसाच) आहे- कुलगुरूंची परवानगी न घेता विद्यापीठातील कुणी अगदी हनीमूनला सुध्दा परदेशी जाऊ शकत नाही. याच नियमाचा गैरआग्रह धरून नकळत किंवा वैयक्तिक कामामुळे परदेशी गेलेल्या लोकांनाही त्रास देण्याचे कार्यक्रम विद्यापीठाच्या भूतकाळात अनेकदा पार पडले आहेत.
भरुचाबाई या कादंबरीच्या संदर्भात कुलगुरूंना काही गोष्टी स्पष्ट सांगून आल्याचे त्यांनीच स्वतः मला सांगितले होते. ही गोष्ट आणखी ज्यांना माहीत झाली अशाच कोणीतरी ही बातमी छापवून आणण्याचा उद्योग केला हे स्पष्ट आहे.
अर्थात्, डॉ. भरुचा यांनी माझ्या मते एक मोठी चूक केली आहे ती म्हणजे, या विषयासंबंधात त्यांनी आपली भूमिका सडेतोडपणे, जाहीरपणे मांडली नाही. आपल्याला काय करायचे आहे- या विद्यापीठासाठी आता काहीही करण्याची माझी इच्छा उरली नाही, बाकी कोणी बोलत नसताना मीच काय म्हणून बोलू वगैरे कारणांनी त्यांनी जाहीर भूमिका घेतली नाही. विद्यावंतांच्या निष्क्रीय सौजन्याचेच हे उदाहरण ठरते. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विदुषी म्हणून त्यांनी आपली भूमिका ठणकावून मांडणे महत्त्वाचे ठरले असते. जे टिकेकरांनी, शांता गोखल्यांनी लिहिले ते त्यांनी लिहिले असते, मांडले असते, तर या विद्यापीठाच्या स्वतंत्र अस्मितेची शान वाढली असती. अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्या कोषातून बाहेर पडून डॉ. भरूचांच्या क्षमतेच्या विद्यापीठातील विद्वानांनी आपली निष्ठा केवळ नोकरीशी नसून, उच्चपदस्थांशी नसून विद्येशी आणि निगडीत मूल्यांशी आहे हे दाखवून दिले पाहिजे.
या विषयाची चर्चा बातमी छापून येण्या अगोदर, विद्याक्षेत्रातील राजकारणाचे आणखी एक आगर म्हणजे एशियाटिक लायब्ररी येथे आधीच सुरू झाली होती असे माझ्या निदर्शनास आले आहे. ती चर्चा झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी बातमी छापून आली हेही पुरेसे बोलके आहे. कसले हे विद्याक्षेत्र- जेथे राजकारणक्षेत्रापेक्षा घाणेरडे आणि नीच राजकारण खेळले जाते.

तापल्या तव्यावर आपल्याही असूयेची पोळी भाजून घ्यायचा हा घाणेरडा प्रकार आहे.

दुसरी गोष्ट लिहायची आहे ती या सर्व विषयाबद्दल लिहिणाऱ्या अरूण टिकेकरांबद्दल. लोकसत्ताच्या संपादकपदी असताना सर्वकाळ बाळासाहेब ठाकऱ्यांवर टीका करण्याच्या भानगडीत पडणे टाळणाऱ्या टिकेकरांनी एकदम जोरदार पवित्रा घ्यावा हे निश्चितच गौरवास्पद आहे. विद्यापीठाचे इतिहासकार म्हणून त्यांनी या घटनेसंबंधी मत नोंदले हे महत्त्वाचे ठरते यात वादच नाही. पण सेनेपासून आपली चामडी आपणही वाचवत होतो हे विसरून, वेळूकरांनी स्वतःची चामडी वाचवायचा प्रयत्न केला तर त्यांची चामडी मात्र तुम्ही तुमच्या लेखणीने लोळवणार हे कसे. वेळूकरांचे इंग्रजी तेवढेसे कसलेले नाही याचा उल्लेख - मी नागपूर विद्यापीठाचा अल्मा मॅटर आहे असे चुकीचे इंग्रजी ते बोलल्याचे लिहून त्यांच्याबद्दलच्या कुलगुरू म्हणून असलेल्या अपेक्षांच्या चिंधड्या उडाल्याचे ते लिहितात. भाषेवर प्रभुत्व नसले, किंवा साहित्य वाचन, व्यासंग कमी असला म्हणजे कुलगुरू काहीही करू शकणार नाही असे म्हणणे हे व्यवस्थापकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपली इतिहासकार-मती तोकडी असल्याचे लक्षण आहे. चारचौघात दुसऱ्याची चूक दाखवली म्हणजे आपण विद्वान ठरतो असे समजण्याची कोती वृत्ती असल्याचे लक्षण आहे.
सच अ लॉन्ग जर्नी हे पुस्तक विथड्रॉ करून नव्या कुलगुरूंनी एक चूक निश्चितच केली असे माझेही मत आहे. परंतु विद्यापीठात करण्यासारखी विद्यार्थीहिताच्या, प्रशासकीय सुधारणांची भरपूर कामे आहेत. ती जरी स्वच्छपणे केली तरी खूप. आणि विद्येशी निष्ठा दाखवणाऱ्या, भले आपल्याशी दुमत असलेल्या विद्वानांचा सन्मान ठेवला तरी खूप.
मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होतेच. सच अ लॉन्ग जर्नी ही काही फार मातब्बर लेखन असलेली कादंबरी मला वाटलीच नाही. त्या कांदबरीच्या भोवतीने पिंगा घालण्याचे तसे काहीच कारण नाही. त्यातील उतारे वाचून दाखवणे वगैरे फालतू ड्रामा अस्थानी आहे. पण आमच्या स्वतंत्र वृत्तीचा अधिक्षेप करण्यास कोणीही धजावू नये अशी काळजी आम्हा सर्वांसकट कुलगुरूंनी घेतलीच पाहिजे. एका चुकीवरून पुढचा धडा शिकणाराच मोठा होतो.
अजूनही आम्हाला आशा आहे....!

Saturday, October 16, 2010

एका सत्यवादीचे पत्र

कॅलिफोर्निया विद्यापीठामधील भौतिकशास्त्राचे प्रोफेसर एमिरेटस असलेले, अमेरिकन विज्ञान-तंत्रज्ञान जगतात अनेक प्रकारे महत्त्वाच्या भूमिका बजावलेले प्रा. डॉ. हेरॉल्ड लुविस यांनी नुकताच अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र मोठे वाचनीय आहे. सध्याच्या मानवनिर्मित वातावरण बदल आणि जागतिक तापमानवृध्दीच्या सद्दीच्या काळात तथाकथित कन्सेन्ससचा बोलबाला एवढा असताना असले पत्र एखाद्या वैज्ञानिकाने लिहिले आहे हे लोकांच्या नजरेस आणून देणे मला महत्त्वाचे वाटते.
डॉ. लुविसचे पत्र विज्ञानाच्या सर्व पाईकांनाच नव्हे तर ज्ञान आणि सत्याशी निष्ठा असलेल्या सर्वच क्षेत्रांतील लोकांना मननीय वाटेल. त्या पत्राचा अनुवाद पुढे देत आहे.

- प्रिय कर्ट,

सदुसष्ट वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रथम अमेरिकन फिजिकल सोसायटीचा सदस्य झालो तेव्हा ती अगदी छोटीशी, सौम्य संघटना होती- तोपर्यंत पैशाच्या महापुरात न्हाऊन भ्रष्ट झालेली नव्हती. ड्वाईट आयझेन हॉवरने अर्धशतकापूर्वी आपल्याला या धोक्याबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तर भौतिकशास्त्र हा विषय निवडून आयुष्याचा मार्गक्रम ठरवणे म्हणजे दारिद्र्याचा, सततच्या अभावाचा वसा घेतल्याचेच लक्षण ठरत होते. दुसऱ्या महायुध्दानंतर हे सारे बदलले. त्यानंतर चांगले उपजीविकेचे साधन मिळवण्याचा एक मार्ग म्हणून अनेकजण भौतिकशास्त्राच्या अभ्यासात शिरले. अगदी अलिकडे, म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी विज्ञान आणि समाजातील एक सामाईक चिंतेचा विषय म्हणून अणुभट्टीच्या सुरक्षा अभ्यासासाठी स्थापन झालेल्या अमेरिकन फिझिकल सोसायटीच्या समितीचा मी अध्यक्ष होतो तेव्हाही, बाहेर या विषयावरून झोंडगिरी करणारे अनेक लोक होते, पण आम्हा भौतिकशास्त्रज्ञांवर प्रमाणाबाहेर दबाव पडण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे जी परिस्थिती आहे तिचे वैज्ञानिक निकषांवर प्रामाणिकपणे मूल्यांकन करणे आम्हाला शक्य झाले. आमच्या कामात काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालेच तर ते तपासून पहायला आणखी एक ओव्हरसाइट कमिटी होती. त्यात असलेले पिएफ पानोफ्स्की, व्हिकी वाइसकॉफ, आणि हॅन्स बेथ यांच्यासारखे उत्तुंग भौतिकशास्त्रज्ञ आमच्या कामात सहाय्यभूत होते. एका भारलेल्या वातावरणात आम्ही जे काम पार पाडले त्याचा मला अतिशय अभिमान वाटला होता. एपीएसच्या अध्यक्षांना दिलेल्या अहवालात ओव्हरसाइट कमिटीने आम्ही ज्या स्वतंत्र बाण्याने काम केले त्याची नोंद घेतली होती. या अहवालावर दोन्ही बाजूंकडून टीका होईल असेही त्यांनी म्हटले होते. यापेक्षा मोठा गौरव कोणता असणार?
आज किती वेगळे चित्र दिसते आहे. असे उत्तुंग मानव या पृथ्वीवर वावरतच नाहीत, आणि पैशाचा महापूर हेच साऱ्या भौतिक-संशोधनाचे, इतर अनेक गोष्टींचे आणि अनगिनत व्यावसायिक नोकऱ्यांचे उगमस्थान ठरते आहे. मी माझी कारणे स्पष्ट करतोच आहे, त्या कारणांमुळे एपीएसचा फेलो असण्यातला माझा इतके वर्षांचा अभिमान आता गळून जाऊन त्याची जागा शरमेने घेतली आहे. मला यात यत्किंचितही आनंद नाही, पण आणि मला या सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा तुझ्याकडे पाठवून देणे भाग आहे.
आज इतके सारे वैज्ञानिक भ्रष्ट होण्यास आणि एपीएससुध्दा ज्या लाटेत वाहवली आहे त्याला कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग स्कॅम आणि त्याला पाठबळ देणारा अक्षरशः अब्जावधी डॉलर्सचा महापूर. भौतिकशास्त्रज्ञ म्हणून मी प्रदीर्घकाळ काम केले आहे, त्यात पाहिलेला असला स्यूडोसायन्टिफिक- (छद्मवैज्ञानिक) बनाव केवळ एकमेवाद्वितीय असाच म्हणेन. आणि त्याला केवढे प्रचंड यश मिळाले आहे... ज्या कुणाला याबद्दल थोडीजरी शंका असे त्याने मांडी ठोकून क्लायमेटगेटची सर्व कागदपत्रे वाचायलाच हवीत. सारे काही उघड होते. मॉन्टफोर्डच्या पुस्तकात सारे काही संगतवार मांडलेले आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की कोणताही सच्चा भौतिकशास्त्रज्ञ- नव्हे तर कोणताही सच्चा वैज्ञानिक हे वाचून घृणेने भरून जाईल. मी तर वैज्ञानिकांची नवी व्याख्याच या घृणेच्या आधारे करू शकेन.
मग या आव्हानाच्या संदर्भात एपीएसने काय केले आहे? त्यांनी हा भ्रष्टाचार सर्वसाधारण मूल्य म्हणून मान्य करून टाकला आहे. उदाहरणार्थ-
1- साधारण एक वर्षापूर्वी आमच्यपैकी काही जणांनी काही सदस्यांना या विषयावर एक इमेल पाठवली. एपीएसने त्यात छेडलेल्या विषयांकडे दुर्लक्ष केले, पण एपीएसच्या अध्यक्षांनी आम्ही हे इमेल पत्ते कुठून मिळवले याची कुटील चौकशी सुरू केली. पूर्वी, एपीएस अशा महत्त्वाच्या विषयांवर सदस्यांनी आपापसात चर्चा करावी म्हणून उत्तेजन देत असे. किंबहुना सोसायटीच्या घटनेत हा एक प्रमुख हेतू मानला गेला आहे. आता नाही. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते चर्चा बंद व्हावी याच दृष्टीने करण्यात आले होते.
2- अनेकांचा विरोध असूनही क्लायमेट चेंजच्या बाजूने जे विधान एपीएसने प्रसृत केले ते अत्यंत घाईघाईने, मोजक्या लोकांना लंचला बोलावून लिहून टाकलेले होते. मी अनेक सदस्यांना ओळखतो, त्यांच्याशी बोलतो, अशा एपीएसच्या सदस्यांच्या विचक्षणेचे त्यात कुठेही प्रतिबिंब नाही. त्यातील काही जणांनी कौन्सिलकडे या मतप्रदर्शनाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. या मतप्रदर्शनातील एक अगदी (अव)लक्षणीय शब्द होता- विज्ञानाच्या दृष्टीने विषारीच- वादातीत सत्य. हा शब्द भौतिकशास्त्रातील अत्यंत नेमक्या बाबींना लागू होतो. या विषयाला तर नक्कीच नाही. ही मागणी होताच एपीएसने एका गुप्त समितीची स्थापना केली. तिची बैठक कधीच झाली नाही, त्यांनी या भूमिकेच्या विरुध्द असलेल्या स्केप्टिक्सना बोलावून कधीही चर्चा केली नाही- आणि तरीही आधीचे विधान संपूर्णतः योग्य असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. त्या विधानाचा सूर जरा नको इतका तीव्र आहे एवढेच त्यांनी मान्य केले. कुणाचाही आग्रह नसताना वादातीत सत्य हा शब्दही पुराव्यांच्या संदर्भात तसाच ठेवला. अखेरीस, कौन्सिलने संपूर्ण विधान होते तसेच ठेवले केवळ त्यात काही अनिश्चितता असल्याचे नमूद केले आणि मग त्या अनिश्चितता मागे सारून मुख्य विधानाला सरसकट मान्यता देण्यासाठी शब्दबंबाळ स्पष्टीकरणांची भर घातली. ते विधान अजूनही एपीएसची अधिकृत भूमिका म्हणून तसेच विराजमान आहे. त्यात जगभरातील सर्व शासनांना दिलेला सल्ला एपीएसचा बडेजाव माजवणारा आहेच पण गाढवपणाचाही आहे... जणू काही एपीएस म्हणजे कोणी विश्वनियंता आहे- मास्टर ऑफ द युनिव्हर्स. असे नाही... आणि आपली नेते मंडळी असे मानतात याची मला लाजच वाटते. हा काही करमणुकीचा खेळ नाही. आपल्या राष्ट्रीय अस्तित्वाचा प्रश्न यात गुंतलेला आहे, वैज्ञानिकांची संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा कसोटीला लागते आहे.
3- आणि मग दरम्यान क्लायमेटगेट घोटाळा बातम्यांतून चव्हाट्यावर आला. प्रमुख भयकंपवाद्यांची कारस्थाने जगापुढे आली. एवढ्या प्रचंड प्रमाणावरचा वैज्ञानिक घोटाळा मी कधी पाहिला नव्हता आणि त्याचे वर्णन करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीत. एपीएसच्या भूमिकेवर याच काही परिणाम दिसावा- काहीही नाही. काहीच नाही. हे विज्ञान निश्चितच नाही. काही वेगळ्याच शक्ती यात कार्यरत आहेत.
4- मग आम्ही काही जणांनी या मध्ये थोडा वैज्ञानिक विचार पुन्हा जागवण्याचा प्रयत्न केला... कारण अखेर एपीएसचा कथित आणि ऐतिहासिक हेतू तोच तर आहे. आम्ही आवश्यक त्या- म्हणजे 200 हून अधिक सह्या गोळा केल्या आणि कौन्सिलने क्लायमेट सायन्सवर, त्यातील वैज्ञानिक मुद्द्यावर खुली चर्चा करण्यासाठी टॉपिकल ग्रुप करावा अशा प्रस्ताव ठेवला. यामुळे भौतिकशास्त्रातील खुल्या चर्चेची गौरवशाली परंपरा जपली जणार होती, राष्ट्राच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे योगदान ठरले असते. तुम्ही आम्हाला एपीएसच्या सदस्यांची यादी देण्यास नकार दिल्यामुळे या 200 सह्या गोळा करणं जरा अवघड गेलं हे मी नमूद करू इच्छितो. एपीएसच्या घटनेनुसार सर्व नियमांची परिपूर्ती करून, आमचा हेतू विस्ताराने स्पष्ट करून हा विषय खुल्या चर्चेसाठी यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले.
5- आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला, घटना गेली खड्ड्यात, तुम्ही आमचा अर्ज स्वीकारायलाच नकार दिलात. त्याऐवजी स्वतःच्या ताब्यात असलेल्या पत्त्यांच्या जोरावर क्लायमेट चेंज आणि पर्यावरणावरील टॉपिकल ग्रुपमध्ये सदस्यांना किती रस आहे याची पडताळणी करण्याचा तुम्ही सुरुवात केलीत. विषय न देता असा ग्रुप करण्याचा प्रस्ताव करण्यात किती जणांना रस आहे असे तुम्ही विचारलेत. तरीही अनेकांनी होकार दिला.(तुम्ही सेक्सबद्दल विचारणा केली असती तर तुम्हाला अधिकच प्रतिसाद मिळाला असता) अर्थातच पुढे असे काहीही झाले नाही. त्यानंतर तुम्ही पर्यावरणाचा भागच वगळलात आणि आता सारे प्रकरण ठप्प आहे. एखादा साधा वकीलही तुम्हाला सांगेल की विषय स्पष्ट न करता अर्जी भरली आणि नंतर रिकाम्या जागा भरू म्हणून सांगितले तर त्यावर कोणीही सह्या करीत नाही. हे सारे करण्यामागचा तुमचा एकच हेतू होता, तो म्हणजे आमचा प्रस्ताव कौन्सिलपुढे नेण्याची घटनात्मक जबाबदारी टाळणे.
6- आमच्या कायदेशीर विनंतीकडे दुर्लक्ष करून स्वतःचा टॉपिकल ग्रुप करण्यासाठी आता तुम्ही आणखी एक गुप्त आणि निष्क्रीय समिती स्थापन करून ठेवली आहे.

क्लायमेट चेंजच्या संदर्भात केलेले दावे तावून सुलाखून घेण्याच्या दृष्टीने काहीही गंभीर स्वरूपाची अभ्यस्त चर्चा घडूच नये म्हणून एपीएसच्या व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच हा प्रश्न झुलवत ठेवला आहे. या संघटनेवरील माझा विश्वास उडाला याचे तुला नवल वाटते कां?
इथे मला एक गोष्ट मुद्दाम नोंदून ठेवण्याची गरज वाटते, कारण इतरांच्या अंतस्थ हेतूंची चर्चा करण्यात जरा धोकाच असतो. एपीएसमधील ही कारस्थाने इतकी विचित्र वाटतात की त्याचे सरळसोपे स्पष्टीकरण देणे कठीण आहे. कुणी म्हणतात, आजकालचे भौतिकशास्त्रज्ञ पूर्वीच्यांइतके हुषार नाहीत, पण तसे काही मला वाटत नाही. मला वाटते, अर्धशतकापूर्वी आयझेनहॉवरने म्हटल्याप्रमाणे, याचे मूळ कारण पैसा हेच आहे... या विषयात अब्जावधी डॉलर्सच्या सोबतीनेच प्रसिध्दी आणि चकचकाटही आहे. शिवाय सुंदर, निसर्गरम्य बेटांना भेटी देण्याची संधीही या क्लबच्या सदस्यांना सहजच चालून येते. जर ग्लोबल वॉर्मिंगचा फुगा अचानक फुटला तर, तू अध्यक्ष असलेला तुझा स्वतःचा भौतिकशास्त्र विभाग वर्षाकाठी काही दशलक्ष डॉलर्सना मुकेल. माइक मानच्या गैरवैज्ञानिक वर्तणुकीला माफी देताना पेनसिल्वेनिया स्टेट विद्यापीठाने किंवा फिल जोन्सला माफ करून टाकणाऱ्या इस्ट अँग्लिया विद्यापीठाने या गोष्टींचा विचार केला असणारच. वेगळा निर्णय घेतला असता तर त्याचा आर्थिक भुर्दंड किती पडला असता याचे त्यांना भान नव्हते थोडेच. जुनी म्हण आहे आपली- वारा कुठल्या दिशेने वाहतो हे कळायला तुम्ही काही हवामानतज्ज्ञ असण्याची गरज नसते.
मी काही तत्वज्ञानी नाही, त्यामुळे आपला बृहद्स्वार्थ साधण्याची आंस आणि भ्रष्टाचार यातील अंतर कुठे ओलांडले जाते याचा काही मी विश्लेषक होऊ शकत नाही, पण क्लायमेटगेटबद्दल जी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत ती वाचून एवढे तर निश्चितच स्पष्ट होते की आता या विषयाचे स्वरुप ऍकेडेमिक राहिलेले नाही.
मला यात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायचे नाही, त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार. आशा आहे की आपण अजूनही मित्र आहोत.

हॅल

हे पत्र वाचल्यानंतर, आपल्या जगाची काळजी वाटणाऱ्या, आणि त्या दृष्टीने जबाबदार वर्तन करण्याची गरज वाटणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्रातील सर्वच प्रचाराबाबत बुध्दीच्या निकषांवर विचार करावा अशी इच्छा व्हावी. पैशाच्या महापुरात वाहून जाणे ही भ्रष्टता असेल पण भावनेच्या महापुरात तर्कबुध्दी गमावणे ही त्यापेक्षाही महाग पडणारी चूक ठरू शकेल.

Friday, October 15, 2010

अभिनंदन

झेवियर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्यांचे अभिनंदन.
सच अ लॉन्ग जर्नी हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याच्या निर्णयाला या विद्यार्थांनी आणि प्राचार्य मस्करेन्हास यांनी आव्हान दिले आहे याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
झेवियर्स महाविद्यालयाकडे स्वायत्तता आहे आणि त्यांनी त्याचा योग्य उपयोग करावा हे सुचिन्ह आहे.
विद्यापीठातील मानभावी विद्वानांनी काही तरी धडा घ्यावा.

Tuesday, October 12, 2010

अविद्येची लॉन्ग जर्नी

बऱ्याच दिवसांत माझे विद्यापीठचा ब्लॉग लिहिला नव्हता. मध्यंतरीच्या काळात सच अ लॉन्ग जर्नी या रोहिन्टन मिस्त्रींच्या पुस्तकावरून नव्या कुलगुरूंनी शिवसेनेच्या दबावापुढे नमतं घेऊन ते ताबडतोब, तडकाफडकी अभ्यासक्रमातून वगळलं म्हणून विद्यापीठाबद्दल, कुलगुरूंबद्दल बातम्या छापून आल्या. अशा पध्दतीने पुस्तक वगळल्याबद्दल विद्वत्क्षेत्रात केवळ अरूण टिकेकरांनीच तेवढा टाईम्स ऑफ इंडियामधून लेख लिहिला. दुसऱ्याच दिवशी आयबीएन लोकमतच्या चॅनेलवर त्याबद्दल चर्चा झाली.
त्यात भाग घेणाऱ्यांत विद्यापीठातील इंग्लिश विभागाचे कोणीच नव्हते.
विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अशा प्रकारे पुढाकार घेऊन एक पुस्तक अचानक अभ्यासक्रमातून मागे घ्यावे हा खरोखरच चुकीचा निर्णय होता. त्याबद्दल अर्थातच सर्वत्र चर्चा होती. पण शिवसेनेच्या गुंडगिरीचे भय सर्वांच्याच मनात इतके घट्ट आहे की त्यापेक्षा होते आहे ते होऊ दे असाच पवित्रा सर्वांनी घेतला. यात विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान होईल, आपल्याला घेराव, मारहाण वगैरे होईल ही भीती होतीच.
शिवाय अनुनयात्मक निर्णय कुलगुरूंनी घेतलेला असल्याने आपण केवळ गप्प बसायचे पण खाजगीत मात्र त्यांच्या अपरिपक्वतेबद्दल, नेभळटपणाबद्दल, अविद्वत् वर्तणुकीबद्दल चर्चा करायची. एवढे करून आम्हाला आमची इंटेलेक्चुऍलिटीची झूल कशी मस्त अबाधित पांघरता आली.
बोर्ड ऑफ स्टडीज्च्या ज्या सदस्यांनी हे पुस्तक अभ्यासक्रमास लावले होते त्यापैकी एकही व्यक्ती त्याच्या बाजूने ठामपणे उभी रहायला धजावली नाही. ते काम नव्या कुलगुरूंनी करायला हवे होते ही त्यांची अपेक्षा होती. ती रास्तच होती. पण त्यांनी स्वतःच्या बुध्दीची, अभिव्यक्ती स्वातंत्र्यनिष्ठेची प्रखरता शिवसेनेच्या समोर सोडा नव्या कुलगुरूंच्या समोर तरी दाखवून दिली कां याचे उत्तर दुर्दैवाने नकारात्मक होते.
नवे कुलगुरू आधीच अदासावंतांच्या अदावतीमुळे आणि अदालतबाजीमुळे जरा अडचणीतच आहेत. त्यांना हे नवीन झेंगट नकोच वाटले असणार. तरीही अशा कसोटीच्या प्रसंगीच कसोटीला उतरण्याची गरज असते हे त्यांनी आता तरी लक्षात ठेवावे. आणि अखेर भिऊन घाबरून काय झाले... शिवसेनेला सांभाळले, त्यांच्या उगवत्या सूर्याला सांभाळले आणि त्यांना 'पदो'पदी ज्यांचा आधार लागेल त्या सत्ताधारी पक्षांच्या लोकांची जोरदार टीका- जाहीर टीका त्यांनी ओढवून घेतली आहे.
मुंबई विद्यापीठात ही कादंबरी ती 2007पासून बीएच्या अभ्यासासाठी लावलेली होती आणि आत्ता त्या सिलॅबसचे अखेरचे वर्ष, अखेरच्या टप्प्यात होते. 1991साली प्रसिध्द झालेली, विदेशात आणि भारतीय विद्वत्-क्षेत्रात गाजलेली ही कादंबरी अचानक आत्ता आक्षेपार्ह कां ठरली?
आमच्या काही भो भो संस्कृतीरक्षक, मर्यादित वाचन आणि मर्यादित बौध्दिक आवाका असलेल्या मित्रांना शिव्यायुक्त वाङ्मय म्हणजे नाके मुरडण्यासारखेच वाटते.
बाळासाहेब ठाकरेंना त्यात शिव्या घातल्या आहेत हे निमित्त करून शिवसेनेच्या एखाद्या तरूण नेत्याला यात स्वतःला मोठं करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी हा इश्यू उचलला हे आपल्या या गचाळ राजकीय-सामाजिक संस्कृतीत अगदी अपेक्षित आणि समजून घेण्यासारखेच, साजेसेच आहे.
बोर्ड ऑफ स्टडीज् मधलं स्थान आणि राजकारण हा शैक्षणिक कर्तबगारीचा सर्वोच्चबिंदू मानणाऱ्या काही ऍक्टिव्ह ऍकेडेमिशियन्सकडूनसुध्दा हीच अपेक्षा होती. या कादंबरीत अशा शिव्या आहेत- काय हे... काय हे... शांतम् पापम् वगैरे रान उठवण्याची सुरुवात असल्याच एका शिक्षकाने केली.
ज्या प्रकारच्या लोकांनी हा इश्यू उचलला, त्यांची नैतिकता आणि बुध्दी यांच्या मर्यादा आपल्याला माहीत आहेत. स्वाभाविकच विकतचे दुखणे कोणालाही नको. आम्ही ऍकेडेमिक्स तर बोटचेपेपणात नंबर एक. आम्ही कणखरपणे उभे रहाणार? झालंच!
आम्हाला कधी प्रॉपर्टीचे नुकसान होण्याची भीती वाटणार, कधी आपल्यावर कोणी हल्ला करेल याची, कधी आपल्या तोंडाला कुणी काळं फासेल याची...
आपल्याला सेन्सॉरशिप नको... अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे. पण सारे कसे सहज अलगद तोंडात साखरभरला गुलाबजाम पडावा तसे. आपल्याला विचार प्रवर्तक लेखन हवे, पण त्याच्या संरक्षणासाठी आपण बोटही वर करणार नाही. लागलीच गुडघे टेकून पुस्तक विथड्रॉ करण्याचा निर्णय घेण्यात सारेच पुढे. कोणीही हुं म्हणायला तयार नाही. वैचारिकतेचा बळी पडला तरी चालेल, आपण आपले सुरक्षित राहिलो म्हणजे झाले.
बुकर अवॉर्डसाठी नामांकन झालेली आणि कॉमनवेल्थ अवॉर्ड मिळालेली ही कादंबरी. भारतीय वंशाच्या, आता कॅनेडीयन नागरिक असलेल्या लेखकाने लिहिलेली पुरस्कारप्राप्त कादंबरी म्हणून ती मुंबई विद्यापीठातच लावली होती असे नव्हे तर इतर पाचसहा भारतीय विद्यापीठांतही बीए, एमएच्या इंग्रजी साहित्याच्या अभ्यासासाठी लावलेली आहे..

काही विद्यार्थी भेटले. त्यांनी सांगितलं की त्या कादंबरीतल्या शिव्यांचा विचारही करावा लागत नाही. आपण कादंबरीच्या विषयाचाच विचार करतो. कादंबरी तशी चांगलीच आहे... पण आम्ही बोलत नाही तर विद्यार्थ्यांनी बोलायची हिंमत दाखवावी ही अपेक्षा आम्ही कुठे करावी...
या साऱ्या निमित्ताने उत्सुकता वाटून ही कादंबरी मी वाचून काढली.
साठ -सत्तर- ऐंशीच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर, पारशी समाजाच्या पात्रांच्या, नायकाच्या दिनक्रमांतून, संवादांतून घडत गेलेली ही कादंबरी आहे. आपणच काय पारशी लोक स्वतःला सुध्दा मॅड बावा किंवा मॅड बावी म्हणवून घेत असतात. आणि जे पटेल ते धश्चोटपणे बोलून टाकायचं हा त्यांचा गुण साधारणतः कॉमन आहेच. कुणालाही साला, साली, बास्टर्ड, रास्कल आणि अनेक असल्या शिव्या ते प्रेमात असतानाही देतात आणि संतापले तरीही देतात. त्यात त्यांना काही फारसे वावगे वाटत नाही. या कादंबरीतील पात्रे त्यांच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, ठाकरे आणि अशा अनेकांवर शिव्या घालत बोलतात. हा त्यांच्या संवादशैलीचा भाग आहे.
ही कादंबरी एका विशिष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून विशिष्ट कालखंडाची दखल आणि सेक्युलर विचारांवरील भाष्य या दृष्टीने महत्त्वाची आहे.
बांगला देशच्या लढाईच्या वेळी सॅम नगरवाला प्रकरण गाजलं होतं. आताच्या विद्यार्थ्यांना आणि या पुस्तकाला विरोध करणाऱ्या कुणालाही त्याची आठवण तरी असेल की नाही कोण जाणे. त्यावेळी जे काही घडलं त्यात संशयाची सुई इंदिरा गांधीकडे सरळ पॉइंट करीत होती. त्या एका सत्यघटनेचा वरवरचा संदर्भ घेऊन ढोबळ पारशी व्यक्तीरेखा घेऊन लिहिलेली ही कादंबरी मला स्वतःला सुरुवातीला बरी वाटली ती एका वेगळ्या समाजाचे चित्रण असल्यामुळे. उत्तरार्धानंतर मात्र ती ढासळत जाते. नायकाच्या कौटुंबिक कथा आणि व्यथा आणि सॅम नगरवालाशी साधर्म्य असलेली मेजर बिलिमोरियाची कथा यातल्या कशालाच नेमकेपणा येत नाही. सेक्युलर भिंतीच्या कथेचीही तीच तऱ्हा. लेखकाला तसे म्हणायचे नसले तरीही, नायकाच्या कुटुंबियांवर ओढवलेले प्रसंग जादूटोणा- प्रार्थना वगैरेंच्या माध्यमातून सुटल्याचे भासते, हा माझा स्वतःचा या कादंबरीवरचा आक्षेप.
फार काही थोर नसलेली ही जरा वेगळ्या पार्श्वभूमीवरची, वेगळ्या वातावरणातली कादंबरी एसवायच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लावली तर त्यात फार काही विशेष नव्हते. असेही आणि तसेही.
खरे म्हणजे जिच्यासाठी धडधडून आग्रह धरावा असे काही मूल्य या कादंबरीत नाही. माझ्या दोन विद्वान पारशी दोस्तांनी तर ती कादंबरी अगदीच सो सो आहे , तिला विरोध तरी कशाला एवढा... म्हणून विषय गुंडाळून टाकला.
पुस्तकाची म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण गुंडगिरीचा काळ विद्यापीठात सोकावला हे नक्की.
आणि विद्यापीठीय विद्वान अगदी सहज बकाबका मूग गिळून बसतात यावरही शिक्कामोर्तब झालं.
विरोध करणारेही राजकारणी, कादंबरी विथड्रॉ केली म्हणून टीका करणारेही राजकारणीच.
पत्रकारितेचे संरक्षक कवच पेहेनलेल्या दोन-तीन विद्वानांनी निषेध नोंदवला. विद्यापीठाच्या इंग्लिश विभागाच्या कुणी नव्हे तर राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. उत्तरा सहस्रबुध्दे यांनी आयबीएन् लोकमतवर निसंदिग्धपणे ही कृती चुकीची असल्याचा बाईट दिला.
तेवढं सोडलं तर आमची लक्तरं दिसतंच आहेत.

Monday, August 23, 2010

विद्यापीठ आणि शहर- म्यूझियमचा प्रस्ताव

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जन्माला आलेल्या तीन विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठ हे एक. या विद्यापीठाच्या स्थापनेनंतरच्या काळात ज्या अनेकांनी शिक्षण घेतले त्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्याच्या जडणघडणीत भाग घेतला. मुंबई शहर ब्रिटिशांच्या काळापासूनच देशाची आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतर तर ते देशाची आर्थिक राजधानी म्हणूनच मान्यता पावले. या आर्थिक राजधानीतले विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाला जेवढी प्रतिष्ठा लाभली तेवढी क्वचितच देशातल्या इतर कुठल्या विद्यापीठाला लाभली असेल.


एका वादळी स्थित्यंतराच्या काळात जन्माला आलेलं हे विद्यापीठ नंतरच्या काळात केवळ स्थित्यंतराचे साक्षीदार न रहाता साथीदार बनले. स्वराज्याचे एकाहून एक महत्त्वाचे मोहरे या विद्यापीठाच्या कमानीखालून गेले. भारताच्या आधुनिक इतिहासाशी इतके जवळचे नाते असलेले हे विद्यापीठ. न्याय, अर्थकारण, राजकारण, कला, विज्ञान, भाषा, साहित्य यापैकी प्रत्येक क्षेत्रात या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक मोहरे या देशाच्या बांधणीत, समाजाच्या घडणीत आघाडीवर राहिले. या मोहऱ्यांची केवळ आडनावं लिहायची ठरवली तरी कितीतरी पृष्ठे व्यावली जातील... घटनांचं बाहुल्य, त्यातील नाट्य हे तर आणखी वेगळं.

मुंबई विद्यापीठाचा आणि मुंबई शहराचा इतिहास एकमेकांत इतका घट्ट विणला गेला आहे की तो वेगवेगळा काढता येणं शक्य नाही. म्हणूनच या विद्यापीठाच्या इमारतीत हा इतिहास बोलका करणारे म्यूझियम असावे ही संकल्पना मी 2007 साली विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात मांडली होती.

जगातील अनेक नामवंत विद्यापीठांत स्वतःची म्यूझियम्स आहेत. त्यातील काही उदाहरणे इथे देत आहे. रशियात कझान विद्यापीठाचा इतिहास मांडणारे म्यूझियम आहे. 1979 साली हे म्यूझियम सुरू करण्यात आले. 1798 साली या विद्यापीठाची जी मुख्य इमारत बांधण्यात आली होती त्याच मुख्य इमारतीत हे त्यांच्या विद्यापीठाच्या इतिहासाचे म्यूझियम करण्यात आले आहे. 1200 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत हे म्यूझियम असून त्यामध्ये जुनी महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, चित्रे, अत्यंत जुनी, दुर्मिळ अशी हस्तलिखिते आणि पुस्तके, विद्यापीठांमध्ये जागतिक कीर्तीचे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी वापरलेली साधने, यंत्रे या साऱ्यांचे जतन आणि प्रदर्शन यात करण्यात आले आहे. एकूण 1500 प्रदर्शनीय वस्तू आणि अनेक कागदपत्रे यात आहेत.

एस्टोनियामधील तार्तु विद्यापीठाच्या म्यूझियमची कथाही जाणून घेण्यासारखी आहे. युरेशियामधील एस्टोनिया या एका छोट्या पण प्रगत देशाच्या तार्तु विद्यापीठाने स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान ओळखून स्वतःच्या इतिहासाचे म्यूझियम केले आहे. डिसेंबर 1976मध्ये हे म्यूझियम सुरू झाले ते विद्यापीठाच्या तळघरात. पण अवघ्या काही महिन्यांतच ते विद्यापीठाच्या जुन्या ऐतिहासिक ग्रंथालयाच्या इमारतीत हलवण्यात आले. हे ग्रंथालय म्हणजे 13व्या शतकात बांधली गेलेली एका मूळ कॅथेड्रलची इमारत होती. विद्यापीठ इतिहासाच्या म्यूजियमची प्रतिष्ठा ओळखणारे बुध्दीवंत तेव्हा सुदैवाने तेथे होते म्हणूनच हे घडू शकलं. 16व्या शतकातील युध्दांची झळ पोहोचलेल्या या इमारतीवर 1985मध्ये या विद्यापीठाने सढळहस्ते खर्च करून ती अतिशय सुरक्षित आणि सुंदर बनवली.

या म्यूझियममध्ये 1632 ते 1995पर्यंतचा तीन शतकांचा इतिहास जपला आहे. यात जुनी वैज्ञानिक साधने, प्रयोगशाळा, वैज्ञानिकांचे कार्य. विद्यार्थी संघटना आणि विद्यार्था जीवनाचा इतिहासही मांडला आहे. दरवर्षी तेथे विद्यापीठ आणि इतिहास या वि,यांवरील अनेकविध अशी किमान 15 तरी प्रदर्सने भरवली जातात. या म्यूजियमची स्वतःची दोन सभागृहे आहेत. त्यापैकी एकात संगीताचे कार्यक्रम नियमितपणे होतात.

एकंदर 65,000 वस्तू आणि अनेक कागदपत्रे येथे प्रदर्शनात मांडून ठेवलेल्या आहेत.

केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, येल विद्यापीठ... या सर्व विद्यापीठांत स्वतःच्या इतिहासाचे दर्शन घडवण्यासाठी भव्य दालने, वॉक-वेज् यांमधून म्यूझियम्स आहेत. या शिवाय या सर्व विद्यापीठांची स्वतःची अशी विविध विषयांवरची इतर म्यूझियम्सही आहेत. पुरातत्व, पुराभिलेख, कलात्मक वस्तू, शिल्पे, चित्रे, स्त्रीवादी कलविषय, विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र अशा नानविध विषयांवरची भव्य म्यूझियम्स ही त्या त्या विद्यापीठांची शान आहे.

आज दोनशे ते सहाशे वर्षांचा इतिहास असलेली ही सारी विद्यापीठे आहेत, पण त्यांतील म्यूझियम्सच्या उभारणीची सुरुवात फार पूर्वीच झाली आहे.

कझान विद्यापीठाच्या म्यूझियमबद्दल एक माहिती. आपल्या विद्यापीठाच्या इतिहासाचे, आपल्या राजकीय आणि शैक्षणिक इतिहासाचे म्यूझियम व्हावे ही कल्पना येफिम बुश्कानेत्स याने प्रथम मांडली. त्यानंतर तीस वर्षांपर्यंत याबाबत चर्चा आणि चर्चा याखेरीज काहीच घडले नाही. अखेर 1979मध्ये या विद्यापीठाची 175 वर्षे पूर्ण झाली तेव्हा शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात हे म्यूझियम साकार झाले. आज हे म्यूझियम कला आणि विज्ञानप्रसाराचे प्रमुख केंद्र म्हणून शहराच्या सांस्कृतिक जीवनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

आपल्या इतिहासाला साजेसं आपलं कार्य असावं अशी जाणीव करून देण्याची क्षमता इतिहासाच्या पुस्तकात जेवढी असेल त्यापेक्षा कैकपटीने अधिक प्रभाव म्यूझियममधील इतिहास दर्शनाने होतो. पुस्तक घेऊन वाचणारांपेक्षा प्रेक्षणीय स्थळ म्हणून म्यूझियमला भेट देणाऱ्यांची संख्या जास्त असते. म्हणूनच विद्यापीठाचा इतिहास लिहिला गेला असला तरीही विद्यापीठ चरित्र लोकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर जिवंत होण्यासाठी म्यूझियमची गरज आहे. कझान किंवा अन्य कुठल्याही विद्यापीठ म्यूझियमच्या उदाहरणावरून हेच स्पष्ट होते की असे म्यूझियम विद्यापीठाच्या एखाद्या गौरवशाली इमारतीतच असायला हवे. त्या इमारतीचा प्रत्येक कठडा, प्रत्येक खांब, प्रत्येक टाइल, प्रत्येक खिडकी, तिच्या कोनशीलेसह प्रत्येक दगड हा त्या म्यूझियमचा भाग व्हायला हवा.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात राजाबाई क्लॉक टॉवरच्या इमारतीत तळमजल्यावरील दोन दालनांमध्ये असे म्यूझियम व्हावे अशी माझी संकल्पना होती. तत्कालीन कुलगुरूंनी प्रथमतः या प्रस्तावाचे स्वागत करून एक समितीही स्थापन केली. या समितीमध्ये माझ्याबरोबर श्री. सदाशिवराव गोरक्षकर, त्यांचे दोन जुने सहकारी आणि ग्रंथालयाच्या दोघी सहकारी होत्या. या ग्रंथालयाच्या दोघींचा या प्रस्तावास पाठिंबा नव्हता. कारण पुस्तके कुठे ठेवणार, अभ्यासक कुठे बसणार असा त्यांचा प्रश्न होता.

खरे म्हणजे या ग्रंथालयातील अनेक ग्रंथ, महाग्रंथ, कलाविषयक ग्रंथ, प्राचीन ग्रंथ, तालपट्टिका हे आता संदर्भग्रंथ म्हणून हाताळले जाण्यापेक्षा म्यूझियम पीसच्या संज्ञेला पोहोचले आहेत.

यातील अनेक ग्रंथ अनेक काळापासून खालच्या भव्य दालनांपैकी एका दालनात एका लांबलचक टेबलखाली ठेवलेले आहेत. ओब्लॉन्ग टेबलखाली ठेवलेले म्हणून त्याला ओब्लॉन्ग कलेक्शन असे गोंडस नाव देऊन तो ग्रंथसंग्रह उघडाच पडलेला आहे. काही काल तरी बोअरर्स, कसर युक्त जुनी टाकून देण्याची टेक्सटबुक टाइपची पुस्तके त्यावरच रचून ठेवलेली मी स्वतः पाहिली होती. खरे म्हणजे ही ग्रंथसंपदाच अशा म्यूझियमची सर्वात महत्त्वाची ठेव असेल. त्यामुळे त्यांच्या या आर्ग्युमेंटला काही अर्थ नव्हता.

दुसरा प्रश्न असा होता की अभ्यासक कुठे बसणार...

मी स्वतः एक महिनाभर लक्ष ठेवून निरिक्षण केले होते, या दोन दालनांपैकी एकात जे पीएच्डी संशोधन करणारे अभ्यासक बसतात त्यांची संख्या अक्षरशः बोटांवर मोजण्यासारखी आहे. कधी तीन, कधी सात, कधी चार, कधी सहा... जास्तीत जास्त संख्या वर्षातील एका दिवशीच होती- अकरा. हे अभ्यासक सहजपणे वरच्या मजल्यावर बसू शकतील एवढी जागा वरही आहे.

ग्रंथालयाचा इतरही वापर फार थोडे लोक करतात याचं प्रमुख कारण, या विद्यापीठातील पदव्युत्तर अध्यापन आणि संशोधन- विधि विभाग वगळता- आता सांताक्रूझ पूर्वेच्या विद्यानगरी परिसरात हलवण्यात आले आहेत याला आता तीन दशकं लोटली. या मधल्या वर्षांत दक्षिण मुंबईत रहाणाऱ्या मोजक्या ग्रंथप्रेमी व्यक्ती ते ग्रंथालय वापरतात. जवळ रहाणारे काही विद्यार्थी परीक्षेपुरता काळ ही जागा अभ्यासाला बसण्यासाठी वापरतात. खालच्या दोन मजल्यांवर म्यूझियम केले तरीही यांचा कुणाचाही तोटा होणार नाही इतकी रिकामी बसण्याची जागा वरच्या दालनांतही आहे.

पण हे ग्रंथालय म्हणजे स्वतःचे संस्थान असल्यासारखा दृष्टीकोन अरूण टिकेकरांसारखे लोक बाळगतात. म्यूझियमच्या आराखड्यावर विचार करण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे कर्णोपकर्णी होताच या संकल्पनेला पहिला विरोध केला तो विद्यापीठ इतिहासाचे पुस्तक लिहिणाऱ्या या अरूण टिकेकरांनी. त्यांना गोरक्षकरांनी काही उत्तर दिले तोच टाटा कन्सल्टन्सीकडून राजाबाई टॉवरच्या संवर्धनाचा प्रस्ताव आला. यात इंटॅक, गरवारे बाई सारेच गुंतले. त्यांनी म्यूझियमचा प्रस्ताव गुंडाळून टाकणे कुलगुरूंना भाग पाडले असेल असे मानायला जागा आहे. कारण या संवर्धनाच्याच नावाखाली ग्रंथालयाचे खालचे एक दालन कॉम्प्युटराइज्ड वर्ल्ड गेटवे लायब्ररीसाठी त्यांच्या ताब्यात देण्याचाही प्रस्ताव होता.

या प्रस्तावापुढे आणि कुठल्यातरी कोपऱ्यातून येणाऱ्या दडपणापुढे तत्कालीन कुलगुरूंनी मान तुकवली. या संदर्भात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा हा विषय म्यूझियम समितीला कळवण्याचीही तोशीस त्यांनी घेतली नाही. त्यापुढे जी काही वादावादी झाली, मराठी वृत्तपत्रांमध्ये हा विषय पोहोचला, बातम्या आल्या त्यातून टाटा कन्सल्टन्सीचा प्रस्तावही बासनात गेला आणि म्यूझियमचाही.

कणखरपणे, ठामपणे काही निर्णय करावे एवढा रस खोलेसरांना निश्चितच नव्हता.

आज हा विषय पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, 2011 साली राजाबाई क्लॉक टॉवर, आणि पदवीदान सभागृह या इमारतींचा वास्तुशिल्पी सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांची जन्मशताब्दी येते आहे. त्यानिमित्ताने इतिहास उजळणारे काही कार्यक्रम करावेत अशी कल्पना मांडली जात आहे. प्रेमचंद रॉयचंद यांचे नातू सुशील रॉयचंद यात पुढाकार घेत आहेत. नव्या कुलगुरूंनाही या संदर्भात काही करावेसे वाटते आहे.

कुणाला काही नवीन उभारण्याची आस असेल तर म्यूझियमचा प्रस्ताव पुनरुज्जीवित होण्याची शक्यता असू शकेल.

Friday, August 20, 2010

दूरशिक्षणाचा दगड बहिःशालवर

आज लोकसत्तामध्ये प्रतिभा कामत नावाच्या बाईंनी माझ्या 13 जुलैच्या पत्राचा संदर्भ वापरून एक पत्र लिहिले. त्यात मला चुकून बहिःशाल शिक्षण विभागाच्या संचालकपदावरून उचलून दूरस्थ शिक्षण विभागाच्या संचालकपदी बसवले. विद्यापीठासंदर्भात टीका करणाऱ्या माझ्याच विभागात कसा सावळागोंधळ आहे हे दाखवण्याचा त्यांचा इरादा होता.  त्यामुळे लोकसत्तात तातडीने पत्र पाठवून खुलासा केला आहे.
पण त्यांच्या पत्रातील दूरस्थ शिक्षण विभागावरील सर्व टीका यथायोग्यच आहे, हेही तितकेच खरे.
आपण कॉम्प्युटरायझेशनच्या या जमान्यात आहोत असं कुणाला खरंही वाटणार नाही आमचा दूरस्थ शिक्षण विभाग पाहून.
या काळात दूरस्थ म्हणवणाऱ्या शिक्षणसंस्थेची फी भरायला विद्यार्थ्यांना कामधंदे टाकून लांबलांब रांगा लावाव्या लागतात.  कार्यकौशल्याचे नावही घ्यायला नको. कामतबाईंनी म्हटल्याप्रमाणे नोट्स् वगैरेंचा आनंदच असतो.
पण हे काहीही न देणारे दूरशिक्षण घ्यायला लाखोंच्या संख्येने विद्यार्थी येतात हीच गोष्ट किती  दुर्दैवी आहे. काहीच मार्ग नाही म्हणून ते येतात. संपर्कव्याख्याने घेणारे शिक्षकही सारी परिस्थिती पाहूनही कधीही काहीही बोलत नसावेत. नाहीतर या प्रतिभा कामतांना आपण ज्या संस्थेत संपर्क व्याख्याने घेतो त्या संस्थेचे संचालक कोण हे तरी माहीत असायला हरकत नव्हती.
सारेच आपल्या टोपल्या टाकून मोकळे होतात, मग कोणी कोणाला बोलावे.
बोलण्याचा हक्क बजावायचा असेल तर आधी आपण आपले काम निष्ठेने करतो आहोत कां हे आपण साऱ्या शैक्षणिक, बौध्दिक लोकांनी तपासून पाहिले पाहिजे.
पार्श्वभागावर एक शिक्का उठवून घ्यायचा म्हणून प्रवेश घेणारे विद्यार्थी जसे शिक्षणाचा दर्जा खाली आणतात तितकेच, आपल्याला तास घ्यायला मिळतात तेवढे घेऊन मोकळे व्हायचे- बाकी उठाठेव करणारे आपण कोण म्हणणारे शिक्षकही.
काही वर्षांपूर्वीची- म्हणजे 1996ची गोष्ट आहे. दूरशिक्षण विभाग तेव्हा आमच्या फोर्ट कॅम्पसमध्ये होता.
देशमुख मॅडमनी नुकतीच साऱ्या इमारतीची रंगरंगोटी करवून घेतली होती.
सप्टेंबर महिन्यात दूरशिक्षण विभागाकडे प्रवेश घेण्यासाठी रांग लागली होती. कित्येक तास मुलेमुली, पोरं घेऊन उभ्या असलेल्या  नवमाता, वाढत्या वयात ग्रॅज्युएशन करण्याची हौस पुरी करण्यासाठी आलेले प्रौढ-  सारीच गर्दी ताटकळत रांगेतून... खालच्या बागेतून, पहिल्या मजल्यावर, तिथून वळतवळत दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचलेल्या रांगेत खोळंबत होती. हे सारे अखेरच्या चार दिवसांत प्रवेशासाठी जागे झाले म्हणून त्यांना ती शिक्षा भोगावी लागते असं एक समर्थन ऐकायला मिळालं होतं. वर पोहोचल्यावर हिडीसफिडीस होतीच .
रांग संपून गेल्यानंतर मी वाचलं होतं... ऑफ व्हाईट रंगाने रंगवलेल्या कठड्यावर कुणातरी संतापलेल्या, फार काही चांगलं वळण नसलेल्या मुलाने खरडलं होतं... All university staff is xxxx.
पंधरा वर्षांनंतरही परिस्थिती तशीच?

Friday, August 13, 2010

भिकारडेपणाचे मूळ उच्च पातळीवरच्या मोठ्या भ्रष्टाचारात

आधीचा ब्लॉग लिहिला आणि कर्मचारी संघटनेच्या सदस्यांना दाखवला. या बाबतीत काही करूया अशी आस तर प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवली.
पण त्यांनी आणखी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यातून बसलेल्या धक्क्यातून अजून सावरायचं आहे.
या लोकांनी जेजे काही सांगितले त्याची सीमा अफाट आहे. परीक्षा विभाग, छपाईची कंत्राटे, तात्पुरती नोकरभरती या क्षेत्रात चालणाऱ्या भ्रष्टाचाराबरोबरच इतर गैर-विद्यापीठीय नेत्यांची, संघटनांची, बिल्डर्सची, खाजगी धंदे चालवणाऱ्यांची दहशत इतकी जबरदस्त आहे... की कोणी कर्मचाऱ्याने एवढेच काय संघटनेच्या नेत्यानेही आवाज करण्याचा प्रयत्न केला, विरोध करून एखादे कृत्य रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला नेस्तनाबूत केले जाईल इतकी मोठी समांतर यंत्रणा इथे नांदते.
ते म्हणाले हे जे तुम्ही लिहिलंय हे तर अगदी क्षुल्लक आहे. वरची पोखरलेली यंत्रणा सुधारली तर खालच्या फुटकळ लोकांची काय बिशाद होईल असं काही करण्याची. परीक्षा विभागासारख्या महत्त्वाच्या विभागात 494 तात्पुरते कर्मचारी आहेत. चार-पाच हजार पगार घेऊन काम करणारे हे कर्मचारीही कुणीतरी, कुणाच्या मार्फत तरी भरलेले असतात... संधी मिळताच असले पैसे काढण्याचे उद्योग जास्तीत जास्त तीच भरती करते असे या नेत्यांचे मत होते. त्यात तथ्यही असेल. पण त्यांच्यावर आपले कायम कर्मचारी अंकुश ठेवत नाहीत कां- याचे उत्तर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या असुरक्षिततेच्या भावनेकडे वळवले.
विद्यापीठातील उच्च पातळीवरील भ्रष्टाचाराच्या त्यांनी सांगितलेल्या कथा अविश्वसनीय वाटाव्यात अशा पण खऱ्याच आहेत. सारे काही बाहेर काढायचे तर या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता हवी. शारिरीक आणि नोकरीचीही.
मागे एकदा कुलगुरू भालचंद्र मुणगेकरांच्या काळात, मुद्रण विभागाने छपाईचे कंत्राट जास्त पैसा देऊन राज्याबाहेर दिले त्याबद्दल चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलल्याबद्दल बोलणाऱ्यावर माध्यमांशी बोलण्याची अनुमती न घेता बोलल्याबद्दल कारवाई करण्यात आली. सात महिने सस्पेंडेड. एकाला एकदा अशी भीती घातली की सारे आपसूक सरळ येतात. गप्प रहातात.
जर काही बदल घडवू आणायचा असेल तर असल्या भीतीचे प्रथम निराकरण करावे लागेल.
मी माझ्या पहिल्या ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले होते-
गेली काही वर्षे या विद्यापीठात काम करणारे कित्येक निष्ठावंत विद्वान आणि कर्मचारी आता वीट आला या विद्यापीठाचा म्हणतात. हे म्हणताना त्यांची मने भळभळत असतात. सोडून जाऊ म्हणतानाच या विद्यापीठासंबंधी अजूनही जिवंत असलेला लोकादर पाहून पुन्हा त्यांची पावले अडखळतात.

ही परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर विद्यापीठावर, विद्यापीठात असणाऱ्यांवर सुजाण टीका होत रहायला हवी. कोणी कुठेही वृत्तपत्रांत बोलू नये, लिहू नये, आपली लक्तरे बाहेर टांगू नये अशी अपेक्षा या क्षेत्रात असताच कामा नये. विद्यापीठाची लक्तरे विद्यापीठीयांनीच दाखवायला हवीत. कारण विद्यापीठाला नवीन वस्त्रे हवी आहेत. कारण विद्यापीठाची वस्त्रे हीच या देशातील युवकांची वस्त्रे असणार आहेत.
विद्यापीठाच्या हितासाठी आपली फाटकी लक्तरे बाहेर टांगायलाच हवीत हे माझे मत मी पुन्हा एकदा अधोरेखित करते आहे.
व्हिसलब्लोअर म्हणतात असे लोक पुढे आले तरच आपली परिस्थिती सुधारायची आशा आहे.
त्यांना विश्वासात घेऊन नव्या कुलगुरूंना काही नवीन सुरुवात करता येईल.
अत्त्युच्ची पदी पोहोचता थोरही बिघडतो हा बोध आहे खरा- असे म्हटले जाते. पण पद हीच काही इतिश्री नाही हे कळले तर माणसं त्यावर मात करू शकतात.
सध्या प्रशासनात राहून प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर खुलेपणाने बोलल्यास त्याला घटनात्मक संरक्षण कसे मिळेल हे सांगणारा कायदेपंडित मी कर्मचारी संघटनेसाठी शोधते आहे. आपली मदत असावी.