Wednesday, August 11, 2010

जैवतंत्रज्ञानाचे मुंबईचे विद्यार्थी कच्चे!

आज एक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील वैज्ञानिक माझ्याकडे आले होते. एका मोठ्या कंपनीत नोकरीवर असल्यामुळे त्यांच्याकडे अनेकदा जैवतंत्रज्ञानाचे विद्यार्थी अनुभव घेण्यासाठी, शिकाऊ म्हणून तर कधी नुसते पहाण्यासाठी येतात. त्यांनी सहज सांगितलं ते दुखावून गेलं. ते म्हणाले, आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईहून आलेले विद्यार्थी अगदीच कच्चे असल्याचं दिसतं. साध्यासाध्या गोष्टी त्यांना येत नसतात. माहीतच नसतात. त्यांना काय कसं शिकवतात कोण जाणे. साधं 10एक्स सोल्यूशन करायला सांगितलं तरी त्यांना तीनतीनदा समजावून द्यावं लागतं. त्या मानाने पुण्याचे, बारामतीचे विद्यार्थी खूप तयारीचे असतात. लॅबमध्ये कामं केलेली आहेत हे कळतं. काय प्रकार आहे हा... कां असं तुमच्याकडे?
मी मान खाली घातली.
आपली मान खाली गेली आहे...
असं कां होतंय याची जबाबदारी कोणाची...
आज जगभरात जैवतंत्रज्ञानाचं महत्त्व वाढतंय. 2025 नंतर जगाची भूक समर्थपणे भागवण्याची शक्ती फक्त जैवतंत्रज्ञानात आहे हे लख्ख आहे. आरोग्यक्षेत्रातही तेच होणार आहे. आपण फक्त व्याख्या पाठ करवून घेऊन पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी बाहेर धाडले तर ते असमर्थ ठरलेले, आणि म्हणून अवहेलना सोसणारे विद्यार्थी नंतर आपल्या मातृसंस्थेचा कान चावायला येतील याचं तरी पुस्तकी शिकवणाऱ्या शिक्षकांनी, संस्थांनी भान ठेवावं.
आवश्यक ती गुणवत्ता आणण्यासाठी खूप पैसा आणता येतो. निष्ठा मात्र अंगभूत असावी लागते.
कुणीतरी बोला यावर!

No comments:

Post a Comment