Thursday, July 15, 2010

माझे विद्यापीठ- सुरुवात लोकसत्तातून


माजी प्रकुलगुरूंची आजी कुलगुरूंच्या नियुक्तीसंदर्भातील वक्तव्य एक निमित्त ठरलं. विद्यापीठातील गोंधळाबद्दलचा राग मनात होताच. त्याबद्दलचा लेख लोकसत्ताच्या मंगळवार, दि. 13 जुलै2010च्या अंकात छापून आला. त्यानंतरच्या अनेक अभिनंदनपर प्रतिक्रियांनंतर एक ब्लॉगच सुरू करावा असे वाटले. लोकसत्तात छापलेल्या लेखात थोडी काटछाट झाली आहे. म्हणून ब्लॉगचं पहिलं पोस्ट मूळ लेखच टाकायचं ठरवलं.

असं मोकळेपणाने, निर्भयपणे लिहायला हवं असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. त्या जातकुळीच्या सर्वांनी यात सहभागी व्हावं हे आवाहन.



माझे विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू आणि सध्याचे राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. . दा. सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीबाबत जी काही वक्तव्ये चालवली आहेत ती वृत्तपत्रांतून वाचायला मिळाली. मनोरंजन झाले. मनोरंजन झाले की साधारणपणे आनंद वाटतो- पण आजकाल काही वेळा असे मनोरंजन होते की त्यामुळे खिन्नताच अधिक येते.
सत्ताधारी पक्षांतल्या, विरोधी पक्षांतल्या प्रखर राजकारण्यांशी ओळखी वाढवून कुठल्याही पदापर्यंत पोहोचता येते हा धडा डॉ. . दा. सावंतांना काही नवा नाही. पण आपली निवड होता दुसऱ्याची झाली की मगच पारदर्शकतेची आठवण यावी... स्वाभाविक आहे!
राजस्थानच्या कुलगुरूंनी आपण नव्या कुलगुरूंपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ आहोत असे म्हणतानाइम्मॉडेस्टीचा दोष पत्करून आपण असे म्हणतो अशी पुस्तीही जोडली आहे. (इम्म़ॉडेस्टीचा दोष पत्करून याचे मराठी भाषांतर आत्मश्लाघेचा दोष पत्करून असेही होऊ शकते किंवा लाज गुंडाळून असेही होऊ शकते). वेळूकरांनी कोणत्याही पी.एच्.डी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले नाही हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आपल्या मार्गदर्शनार्थ असेल्या विद्यार्थी संखेपेक्षा त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे हा एकच निकष कुलगुरूपदासाठी श्रेष्ठत्व ठरवण्याचा असू शकत नाही हे शोधसमितीला कळले हे बरे झाले.
विद्यापीठाच्या कामाचे, रिझल्ट्स्चे, एकंदर कार्यक्षमतेचे, पदव्यांच्या दर्जाचे धिंडवडे निघत असताना कुलगुरू पदावरील व्यक्तींनी किती पी.एच्.डी धारकांना गाईड केले (काढले?) यापेक्षा इतर अनेक गुण महत्त्वाचे ठरू शकतील. अर्थात ते सर्व गुण विद्यमान कुलगुरू डॉ. वेळूकरांच्यात आहेत की नाहीत हे सिध्द व्हायचे आहेत. पण मागल्या कुलगुरूंच्या कारकीर्दीत कुलगुरू आणि प्रकुलगुरू दोघांचाही वकूब सुमार होता हे पुरेसे सिद्ध झालेले आहे.
डॉ. . दा. सावंत हे त्यांच्या कामापेक्षा यांच्या प्रदीर्घ भाषणांसाठी जास्त प्रसिद्ध होते. त्यांना प्रकुलगुरू या नात्याने बोलवल्यानंतर ते बोलू लागले की महाविद्यालयांतील आणि विद्यापीठांतील श्रोते अक्षरशः जेरीस यायचे. ‘कमीत कमी चाळीस मिनिटेअशी त्यांची ख्यातीच झाली होती.
काही कामे अर्थातच तत्कालीन कुलगुरू-प्रकुलगुरू जोडीने केली. हे म्हणायला पाहिजे नाहीतर माजी प्रकुलगुरू आपण केलेल्या कामांची यादी ऐकवायला सुरुवात करायचे- की गेली चाळीस मिनिटे. तशी बरीच कामे करणे त्या पदावरच्या व्यक्तींना भाग असते. पण एखादे काम झाले नाही की प्रकुलगुरू डॉ. . दा. सावंत आपल्या दरबारात या गोष्टीला कुलगुरू आणि कुलगुरूच कसे जबाबदार आहेत हे फुलवून फुलवून सांगत.
आपली टर्म संपता संपता डॉ. . दा. सावंत, प्रकुलगुरू मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष, बॉम्बे रोझ सोसायटी, यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यानगरीमध्ये विद्यापीठाशी तसा संबंध नसलेले गुलाबाचे उद्यान करवून घेतले. गुलाबाचे प्रदर्शन राजभवनात घेऊन दरबारी ओळख सुवासिक केली... पण हाय रे दैवा... राज्यपाल बदलले आणि सारी गुलाबी फील्डिंग वाया गेली.
खरे तर एका राज्याच्या विद्यापीठात कुलगुरू असणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या राज्याच्या राज्यपाल कचेरीच्या पारदर्शकतेबद्दल अशी बडबड केली तर ती राजशिष्टाचाराला धरून आहे कां याची शहानिशा व्हायला हवी.
पण डॉ. . दा. सावंतकाय बहु बडबडलेहा मुद्दा खरेतर तसा फार महत्त्वाचा नाहीच. पण कोणी शिरजोर होऊन बोलावं- त्याला काही मर्यादा असावी.
गेले नऊ महिने मुंबई विद्यापीठाचा कारभार पार्टटाइम कुलगुरूंनी सांभाळला. यात त्या व्यक्तीचा तसा दोष नाही. आजवर कुलगुरू नसलेल्या काळात विद्यापीठातील सर्वात ज्येष्ठ प्राध्यापकांकडे चार्ज देण्याची पध्दत होती. या वेळी अपवाद करून दुसऱ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पदभार देण्यात आला. त्यानंतर जे झाले ते अपेक्षितच होते. आताच्या नियुक्तीबद्दल बौध्दिक पातळीवर आव्हाने देणारे सारे ज्येष्ठ प्राध्यापक तेव्हापासून गप्प बसले याचे कारण काय असू शकेल बरे? आपल्यातल्याच संभाव्य प्रतिस्पर्ध्याच्या हाती काही काळासाठी सत्ता जाण्यापेक्षा हे बरे वाटले होते? ओंडका राजा बरा!
विद्यापीठातल्या सर्वच बुध्दीवंत म्हणवणाऱ्या प्राध्यापक-अध्यापकांकडे आजच्या दुरवस्थेचा दोष जातो. आम्ही सारे कमिट्यांच्या मानमरातबांच्या किरकोळ राजकारणात इतके गुंग होतो की हास्यास्पद ठरतो. बोर्ड ऑफ स्टडीज् असो, संशोधनांसंबंधीच्या समित्या असोत, चौकशी समित्या असोत या सर्व ठिकाणी दुसऱ्या गटाच्या अमक्या तमक्याची जिरवायची हा अंतःप्रवाह खळखळाट करीत असतो. अनेक कार्यक्रम पार पडतात ते मार्चपर्यंतचा अनुदानांचा किंवा बजेटचा शिधा संपवण्यासाठी. अनेक योग्य व्यक्तींना नियुक्त्या मिळत नाहीत कारण कदाचित त्या आल्या तर आपले पितळ उघडे पडेल म्हणून.
व्यक्तीचा व्यासंग, क्षमता पहाता त्याच्यावर लागलेले शिक्केच फक्त इथे तपासले जातात. सध्याच्या किडलेल्या विद्व्यवस्थेत दर्जा, गुणवत्ता वादातीत आहे अशी परिस्थिती ग्रॅज्युएशनची नाही, पोस्ट-ग्रॅज्युएशनची नाही आणि पी.एच्.डीच्या पदवीची तर नाहीच नाही. शिक्षणक्षेत्रात नोकरी मिळवायची तर ग्रॅज्युएशनला-पोस्ट ग्रॅज्युएशनला फर्स्टक्लास किंवा हायर सेकंड क्लास लागतो. मग शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्याच्या नाकातली वेसण येते. त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळावेत या प्रयत्नांऐवजी त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स किंवा नापासच करायचा प्रयत्न पेपर्स तपासणारे बरेच शिक्षक करतात- या घटना कळत रहातात. दगडांखाली हात सापडलेले कणाहीन विद्यार्थी आणि अनेकदा कणाहीन शिक्षकही या गोष्टींबद्दल आवाज उठवत नाहीत. इन्क्रिमेंट मिळते म्हणून संशोधनाचीच काय तर्कशुध्द विचारही करायचीही कुवत नसलेले अनेक लोकयोग्यगाईडच्या शोधात असतात. गाईड देतील तो विषय घेऊन फटाफट प्रबंध कसा लिहायला जमतो यांना- कोणी विचारत नाही. आपल्याकडील पी.एच्. डी संशोधन हा बहुतांशी पगारवाढीचा, नोकरी पक्की करण्याचा टप्पा ठरतो आहे. गांभीर्याने संशोधन करू इच्छिणाऱ्या अनेकांची मने या प्रकारामुळे विदीर्ण होतात. पण विद्यापीठातले दुकान असे बंद होऊन थोडेच चालेल? आता तर कुलगुरू होण्यासाठी जास्तीत जास्त पी.एच्. डी काढण्याचा नवा फंडा सावंत साहेबांनी दिला आहे.
तुम्ही माझ्या विद्यार्थ्याचे एक्स्टर्नल रेफरी- मी तुमच्या अशी मिलीभगत जागोजाग होऊन आपल्या विद्यापीठांतून कितीतरी संशोधन होते, कितीतरी डॉक्टरेट्स होतात. यातल्या अनेकांना इतर संबंधित विषयांसंबंधी सोडा, आपल्या विषयासंबंधी चार वाक्ये स्वतंत्रपणे लिहिता येतील कां ते तपासायलाच हवे. तरीही पी.एच्. डी संशोधनाची लयलूट आहे.
इंटरनॅशनल अलायन्स फॉर रिसर्च युनिवर्सिटीज् या 2006 साली स्थापन झालेल्या शिखर संस्थेत जगातील केवळ दहा नामवंत विद्यापीठे आहेत. त्यात भारतातील एकही नाही. खरे म्हणजे त्यांनी पायघड्या घालून आपल्याला बोलवायला हवे. कां बरं बोलवत नाहीत? बहुधा त्यांच्याही निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसावी झालं!
विद्यापीठाच्या परिस्थितीची रड सांगायची तर आमच्या कॅम्पसमधल्या इमारतींची दुर्दशा सांगितल्याशिवाय कथा पुरी होतच नाही.
डॉ. खोले आणि डॉ. . दा. सावंतांच्या कार्यकालात या विद्यापीठाने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला. या काळातही विद्यानगरी कॅम्पसमधल्या इमारतींची कळा सुधारली नाही. फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरूंच्या विंगचे, दीक्षान्त सभागृहाचे नूतनीकरण आभा लांबा या प्रज्ञावंत हेरिटेज आर्किटेक्टमुळे अतिशय उत्कृष्ट झाले. बाकीची इमारत तशीच वास मारणाऱ्या मुताऱ्यांसकट दिवस ढकलते आहे.
विद्यानगरी कॅम्पस तर झोपडपट्टीचं कोंदण लाभलेली जरा वरच्या स्तरातली आणखी एक ढासळती वस्ती. काही नव्या इमारती सोडल्या तर बाकीच्यांचे रंग इतके उडालेले की पहावत नाहीत. अगदी मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेली आंबेडकर भवनाची इमारत- वाईट डिझाइन तर आहेच पण निदान वेळोवेळी रंगसफेदी करून लाज राखावी असेही कुणाला वाटले नव्हते. आपापली दालने एसी, सोफा मंडित असली की वरिष्ठांचे काम होते. मेन्टेनन्सची कामे करणारे सर्व कर्मचारी प्राधान्याने हीच कामे करतात हे ओघानेच आले. इतरत्र आनंदी आनंद.
कुलगुरू-प्रकुलगुरूंना असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसेल हे ठीक आहे- पण मुख्यतः अभाव आहे तो दृष्टीचा. सेनेटचे एक सदस्य दीपक मुकादम मला एकदा म्हणाले होते या विद्यापीठाला आता एका सीइओ कुलगुरूची गरज आहे. अगदी खरंय.
पी.एच्.डी विद्यार्थी कमी असले तरी चालेल पण आपल्या संस्थेच्या अंतर्बाह्य अब्रूचे धिंडवडे थांबवण्याइतकी कार्यनिष्ठा आणि क्षमता असलेल्या कुलगुरूंची गरज आहे.
आपल्या भोवती रुंजी घालणाऱ्या घनिष्ठांना किंवा पायपुसण्यांना प्राधान्याने कृपाप्रसाद वाटणारे कुलगुरू अलिकडच्या काळात भरपूर होऊन गेले. गुणवत्तेचा विचार करून स्तुतीप्रियतेची शिकार होणारे कुलगुरू हवेत.
शिस्त आणण्यासाठी यंत्रे बसवण्यापलिकडे विचार करू शकणारे प्रशासक भरपूर होऊन गेले. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विद्याकेंद्री कामासाठी स्वच्छ वातावरण आणि ऊर्मी देणारे कुलगुरू हवेत.
इतरांच्या कल्पनांना उचलून धरलं तर श्रेय द्यावं लागेल म्हणून कल्पनाच ठेचून टाकणारे पोषाखी कुलगुरू खूप पाहिले. इतरांना मोठं करत स्वतः मोठं होणारे कुलगुरू हवेत.
गेली काही वर्षे या विद्यापीठात काम करणारे कित्येक निष्ठावंत विद्वान आणि कर्मचारी आता वीट आला या विद्यापीठाचा म्हणतात. हे म्हणताना त्यांची मने भळभळत असतात. सोडून जाऊ म्हणतानाच या विद्यापीठासंबंधी अजूनही जिवंत असलेला लोकादर पाहून पुन्हा त्यांची पावले अडखळतात.
या दुःखाला कारण आहे सातत्याने मिळत गेलेले सुमार नेतृत्व. विद्यापीठाच्या तीन महत्त्वाच्या सभागृहांत चालणारे कोते राजकारण, प्रशासकीय रद्दीनिर्मितीचा अव्याहत उद्योग, पोट भरण्यासाठी विद्येचे पीठ करणाऱ्या शिक्षकांची, तथाकथित विद्वानांची मांदियाळी.
तरीही... ही परिस्थिती सुधारेल अशी आशा तर ठेवायलाच हवी.
ही परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल तर विद्यापीठावर, विद्यापीठात असणाऱ्यांवर सुजाण टीका होत रहायला हवी. कोणी कुठेही वृत्तपत्रांत बोलू नये, लिहू नये, आपली लक्तरे बाहेर टांगू नये अशी अपेक्षा या क्षेत्रात असताच कामा नये. विद्यापीठाची लक्तरे विद्यापीठीयांनीच दाखवायला हवीत. कारण विद्यापीठाला नवीन वस्त्रे हवी आहेत. कारण विद्यापीठाची वस्त्रे हीच या देशातील युवकांची वस्त्रे असणार आहेत.
आपली नियुक्ती झाली नाही म्हणून पारदर्शकतेची भाषा बोलणाऱ्यांवर, नियुक्ती झाल्यानंतर सहा-सात महिने सत्कार घेत, गहिवरली भाषणे करणाऱ्या सर्वांवर, विद्यार्थांवर अन्याय करणाऱ्या शिक्षकांवर, पैसे चारून मार्क्स वाढवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर, वाढीव मार्कांपासून ते मार्कशीट वेळेवर देण्यासाठी कसल्याही प्रकारच्या कामासाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर, पैसे मागून ऍडमिशन देणाऱ्या प्राचार्यांवर, त्यांना तसे करण्यास उद्युक्त करणाऱ्या व्यवस्थापनांवर, पक्षीय राजकारणाचे मैदान म्हणून विद्यापीठाचे अंगण वापरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर. विद्याक्षेत्रातील नियुक्त्यांसाठी दडपण आणून स्वतःचे निम्नदर्जाचे पित्त्ये भरू पहाणाऱ्या राजकारण्यांवर विद्यापीठीय स्वजनांनी, सज्जनांनी सातत्याने, निर्भयपणे आणि जोरकस आवाजात टीका करीत राहीले पाहिजे. तितकेच स्वतःचे काम निष्ठेने करीत राहिले पाहिजे.
नवनियुक्त कुलगुरू कसदार असतील तर ते सत्याच्या बाजूने उभे राहतील. नसतील तर मागच्या पानावरून पुढे कथा सुरू राहील. पण असा कस असेल तर त्यांच्या वयाचा, त्यांनी पी.एच्.डी किती काढले याचा, किंवा त्यांनी कुणाशी ओळखी वाढवल्या आणि नियुक्ती करून घेतली त्याचाही बाऊ करण्याचं कारण रहाणार नाही.
अशी समर्थ टीका करणाऱ्या सर्वांची निष्ठा विद्यापीठ प्रशासनाशी नव्हे तर विद्यापीठाशी असायला हवी.
त्याही पुढे जाऊन- निष्ठा विद्यापीठाशीच नव्हे तर विद्येशी असायला हवी !



No comments:

Post a Comment