Tuesday, July 20, 2010

प्रवेशद्वार

आमच्या विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसच्या बाहेर प्रचंड मोठे बॅनर्स लागलेले असतात.  ना. राणे, डॉ.राणे, राजसाहेब, कृपाशंकरजी, मा.ना. शरद्चंद्रजी, उद्धवसाहेब यांच्या नावांनी सजलेले दहादहाफूट लांबरूंद फलक दाराशीच असतात. विद्यापीठाचे नाव लिहिलेली झुरताड पाटी त्यात तोंड तपवत उभी आहे जेमतेम.
ग्रँड हॅयातच्या समोर एक प्रवेशद्वार करून ठेवलंय. खोले-सावंत द्वयीच्या काळात अडीच वर्षे त्याचं काम चाललं होतं. कुठल्या वशिल्याच्या तट्टू डिझायनरने त्याचं डिझाईन केलंय माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची इच्छाही नाही. पण हे गचाळ प्रवेशद्वार पाहिल्यानंतर या विद्यापीठाच्या या प्रशासकांनी कधीकाळी कुठलं दर्जेदार विद्यापीठ पाहिलंच नसावं अशी शंका येते. पण तेही खरं नाही- सगळे कुलगुरू तसे भरपूर जग फिरून येतात हे आपल्याला माहीत आहे. आपणही सारे अनेक विदेशी विद्यापीठांत पिरून आलेलो असतोच.
या प्रवेशद्वारापाशी बाहेरचा रस्त्याचा भाग आहे तो अजूनही धड झालेला नाही. आणि आत शिरताना विद्यापीठाचे नावही नाही. साईनाथ दुर्गे यांच्या नावाचा फलक सिमेंटच्या ठोकळ्यांवर लागलेला तेवढा दिसतो.
आपल्यापैकी कुणालातरी विद्यापीठाच्या या दर्शनाबद्दल तीव्रतेने वाईट वाटलं कां कधी? वाटलं असेल तर... नक्कीच वाटलं असेल.  पण बोलतो कोण... आपण कशाला वाईट व्हा? आपलं काम नाही ते! आपण ठरवून घेतलंय. आपण आपली चौकट मोडायची नाही. जब जब सिर उठाया एपनी चौखट से टकराया. कवीने आपल्याला प्रेरणा देण्यासाठी थोडच लिहिलं? ते तर आपण माना कायम वाकवून ठेवाव्यात म्हणून सांगून ठेवलं बिचाऱ्याने !
विद्यापीठाच्या दारात काही चांगलं नाही उभारू शकलो आपण- आपण पडलो थर्ड वर्ल्ड. आपल्याकडे फंड्स्ची बोंब. नाही उभ्या करू शकलो संगमरवरी कमानी. एखाद्या प्रख्यात भारतीय शिल्पकाराचे ग्रेनाइट किंवा ब्रॉंझचे शिल्प विकत घेऊन मांडण्याची आर्थिक ताकद नाही आपली. आपल्या फोर्ट कॅम्पसच्या दारावरची नावाची कमान रेल्वे यार्डाच्या कर्षण उपकेंद्राची असते अगदी तश्शीच सुंदर निळ्या रंगात रंगवलेल्या पत्र्याची आहे.
ठीक आहे... पण निदान फुटकळ राजकारणी हेतूंनी रंगवलेल्या फ्लेक्सचे बटबटीत फलक तिथे टांगले जाऊ नयेत एवढीही आपली इच्छाशक्ती नसावी?
लाज वाटायलाच हवी आपल्याला.

No comments:

Post a Comment