Sunday, July 18, 2010

गंमत

आजच्या फाउंडेशन दिनी नव्या कुलगुरूंनी विद्यानगरीत वृक्षारोपण केले. ही तर सर्वमान्य प्रथा आहे. यात कसली गंमत... त्यांनी अ.दा.सावंतांनी स्थापन केलेल्या गुलाबपुष्प उद्यानात नवीन गुलाबाची रोपे लावली- क्या अदा है!
माझा ब्लॉग वाचलेले एक वात्रट मित्र कुजबुजले- हे म्हणजे त्यांना आपल्या थडग्यावरच गुलाब वाहिल्यासारखं वाटेल नाही?!
क्या अदावत है!
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसमध्ये  नाल्याच्या काठाने एक वनस्पती उद्यान व्हावे अशी कल्पना बावीस वर्षांपूर्वी डॉ. एस्, एम्. करमरकर या वनस्पतीशास्त्राच्या ज्येष्ठ प्राध्यापकांनी मांडली होती. ती अडगळीत गेली. मग 1998 साली मी आणि डॉ. शरद चाफेकर, डॉ. लट्टू अशा तिघांनी मिळून पुन्हा एकदा ती व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यावेळच्या कुलगुरूंनी- कोण आहे रे तिकडे- नकाशा कुठेय,  कुठे आहे नकाशा- कुठे आहेत ते एंजिनिअर- असा जोरदार आरडाओरडा सुरू केला आणि ते तिथेच संपलं. 2000 साली आलेल्या तथागतांनी विषय काढताच- व्हेन आय वॉज इन कुआलाsssलंपूर असा सूर लावून विषय आपल्याला कळतच नसल्याचं पुरेसं स्पष्ट केलं आणि ते तिथंच संपलं. 2004 साली शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने या कल्पनेला बरे दिवस येतील अशा आशेने मी पुन्हा एकदा कुलगुरूंकडे विषय काढला. प्रकुलगुरूंना त्यातले जास्त कळते म्हणून त्यांनी तो प्रकुलगुरूंकडे सोपवला. पण कमिटी माझ्या सूचनांनुसार स्थापन झाली. नको इतकी बकबक करून विषयाला फाटे फोडणारे काही लोक मी हेतूपूर्वक वगळले होते. नाहीतर असल्या कमिट्यांत बकवास जास्त आणि काम कमी होते हा विद्यापीठाच्या इतिहासाचाच भाग आहे. पण प्रकुलगुरूंनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठका सुरू केल्यानंतर त्यांना मागील दारातून आत घेतले. मग व्हायचे तेच झाले. अहो सगळा कॅम्पसच एक बोटॅनिकल गार्डन करू ना आपण असला फालतू बाजा वाजू लागला. तीन बैठकांनंतर बोटॅनिकल गार्डनसाठी बैठका बोलावण्याचं बंदच झालं. केंद्र शासनाकडून संपूर्ण आर्थिक सहकार्य मिळणं शक्य असतानाही, चांगले तज्ज्ञ काम करण्यासाठी उपलब्ध असतानाही या कल्पनेचा बोऱ्या वाजवण्यात आला.
त्या ऐवजी प्रकुलगुरूंनी गुलाबाचे उद्यान करवून घेतले. त्यात काही वाईट झाले असे नाही. पण त्यांनी बोटॅनिकल गार्डनच्या निर्मितीची कल्पना किती ठेंगणी केली, ते विसरता येत नाही. आणि त्यामागचा अजेंडा लक्षात घेता, आज तिथे नव्या कुलगुरूंना रोप लावताना पाहून चांगलीच गंमत वाटली.
कुणा गंध कुणा काटे.

1 comment:

  1. If the NSS units of various Colleges were given a chance the tree plantation would have been accomplished without aid from any agency.
    The esteemed names mentioned above have been my teachers too and really feel bad that the suggestions by these visionaries have not been respected.
    Kale P G

    ReplyDelete