Friday, July 23, 2010

सावध ऐका या आरोळ्या

टाइम्स ऑफ इंडियामध्ये आज टिकेकरांनी कुलपतींना कळकळीची विनंती केलीय. ती आपल्यापैकी बहुतेकांनी वाचलीच आहे.
सध्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया आणि निर्णय हे सद्य राजकीय सत्ताखेळाचे प्रतिबिंब आहे या सत्याचा हा कोळसा उगाळून काही साध्य होईल असे अजिबातच नाही. हे सारे आता बोलणारे-लिहिणारे लोक विद्यापीठाला गेले नऊ महिने कुलगुरू नव्हता तेव्हा काही फारसे बोलल्या, लिहिल्याचे स्मरत नाही.
की विद्यापीठाच्या इतिहास लिहिण्याची पुढली संधी मिळेल तेव्हा या पडीक काळाचा नाट्यमय उपयोग करून घेता येईल असा विचार होता इतिहासकारांचा?
तेव्हा गप्प बसून राहिलेले हे इतिहासकार भाष्यकार आता भाकड विनंत्यांचा गळा काढून स्वतःचे अस्तित्व जाणवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत या पलिकडे मला त्याचा अर्थ लागत नाही. कोळस्कर पूर्वीच्या कुलगुरू निवडीच्या धांदलीत स्वतः होते. नंतर ते स्वतःच शोध समितीचे सदस्य बनले. पण त्यानंतर जर ते त्या पदाच्या शर्यतीत राहिले नसतील तर त्यांना शोध समितीत स्थान मिळाले तर बिघडले कुठे?  डॉ. कोळस्कर बुध्दीमान आहेत, विद्वान आहेत यात तर दुमत नाही ना?
काही दिवसांपूर्वीच एकदा टिकेकरांनी टाईम्स ऑफ इंडिया विद्यापीठासंबंधीच एक लेख लिहिला होता. डेथ ऑफ अ युनिव्हर्सिटी-  त्यातले मुद्दे योग्यही होते.  विद्यापीठ मरते आहे म्हणण्यापेक्षा मी जखमी होते आहे म्हणेन. कारण जखम बरी करता येते. मृत्यू परतवता येत नाही.
आपण सारे या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, शिक्षक आहोत... आपण मनावर घेतलं... तर या कडवट मनोवृत्तींना असे मृत्यूलेख लिहिण्याची संधी कदाचित् मिळणार नाही.
निदान म्हणून तरी आपण सारे बोलू, निर्भयपणे जे पटत नाही ते लिहू. विचार मांडणे आणि विचारांनुसार काम करणे हे आपले एकमेव शस्त्र आहे.- जखम साफ करण्याचे, शिवण्याचे.
कुलगुरू कोण झाला कसा झाला याच्या चर्चा चावण्यापेक्षा  तो काही काम करतो कां की पोषाखीपणा करतो,  मूलगामी बदल करण्याचे धैर्य दाखवतो की उगा वरवरचं काम करून आपली टर्म सुखेनैव संपावी म्हणून दिवस काढतो- या गोष्टींकडे लक्ष ठेवणं आणि त्याच्या हातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं म्हणून वैचारिक धैर्य दाखवून, ताठपणे कामं करणं हे जास्त महत्त्वाचं.
अग्रलेख लिहिण्याची सत्ता हाती असताना सोयीप्रमाणे कुणाला मुका कुणाला दम देण्याचे तंत्र साधलेल्या तथाकथित संपादक-इतिहासकाराच्या विद्यापीठ उद्धाराच्या आरोळीला माझ्या लेखी किंमत नाही.

2 comments:

  1. i really wonder some time how people can pretend so much.....

    ReplyDelete
  2. Mugdhaji,
    Congrats again.
    I really appreciate the possitive approach you have exhibited.
    Kale

    ReplyDelete